मुंढवा – महापालिकेची निवडणूक रखडल्याचे पालिका प्रशासनाच्या पथ्यावरच पडले आहे. पालिकेकडून गाव समाविष्ट प्रक्रिया राबविली जाताना 2017 मध्ये 11 तसेच 2019 मध्ये 23 गावे पालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर करोनाची दोन वर्षे गेली तर पालिकेवरील नगरसेवकांच्या कार्यकाळाची मुदत संपली, यामुळे गेली सात वर्षांपासून 11 गावे तर सहा वर्षांपासून 23 गावे पालिकेच्या निधीपासून वंचीत आहेत.
निधी अभावी कुठलीही नवी योजना पालिकेत समावेशानंतर या गावांत झालेली नाही. लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या निवडणुकांचा कालावधी पाहता यावर्षीही महपालिकेच्या निवडणुका होणार नाहीत, त्यामुळे महापालिकेवर २०२४ वर्षे ही प्रशासक राज राहणार आहे.
महापालिकेचा कालावधी मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आला. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने पालिकेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, लोकप्रतिनीधी नसल्याने समाविष्ट गावांच्या विकासाला आणखीच खिळ बसली. रस्त्यावरील खड्ड्यांची दुरूस्ती करणे, चेंबरवरील झाकण बसविणे अशा कामांसाठीचे निवेदने माजी नगरसेवकांना आयुक्तांना द्यावी लागत आहेत. परंतु, यातून होणाऱ्या कामाचा वेगही कमीच आहे. या कारणातून गेली दोन वर्षे किरकोळ कामेही झालेली नाहीत.
दरम्यान, महापालिकेत समाविष्ट गावांचा विकास आराखडा तयार नसल्याने या गावांना कुठल्याही मूलभूत सुविधा अद्यापही पुरविल्या गेलेल्या नाहीत. यामध्ये पाणी पुरवठा योजना प्रामुख्याने कोरड्याच आहेत. या गावांचा विकास आराखडा तयार करा, मूलभूत गरजांसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून घ्यावा, अशी माजी नगरसेवकांकडून होत आहे. मुंढवा, केशवनगर ही गावे शहरालगत असतानाही पालिकेतून या भागात कोणतीही ठोस कामे गेल्या दोन वर्षांत झालेली नाहीत. तर, अन्य गावांतही मूलभूत सुविधा राबविण्याकडेही पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. आता, नव्या 2024 वर्षात समाविष्ट गावांचा विकास करावा, अशी अपेक्षा या गावांतील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या गावांना पाणी पुरवठाच नाही
मुंढवा, केशवनरगर यासह मांजरी बुद्रुक, उंड्री पिसोळी, शेवाळेवाडी, औताडेवाडी, हांडेवाडी, होळकरवाडी, वडाचीवाडी, गुजरवाडी, म्हाळुंगे, सूस, कोंढवे-धाडवे, नांदेड, कोपरे, किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी, सणसनगर, काळेवाडी, भिलारेवाडी या समाविष्ट गावांत पाणी पुरवठा होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.