कोंढवा – केंद्र सरकारने पारित केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात उंड्री (ता. हवेली) येथील ट्रक, टेम्पो, ट्रॅव्हल्स, कार चालकांनी तीव्र संताप व्यक्त करीत कडकडीत बंद पाळून केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला. ड्रायव्हर म्हणून काम करण्यापेक्षा बिगारी म्हणून काम करू, असा पवित्रा चालकांनी घेतला आहे. त्यामुळे वाहनचालक आणि त्यांच्या परिवारासाठी नवीन कायदा रद्द केला पाहिजे, अशी मागणी उंड्रीचे माजी सरपंच, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवृत्ती बांदल यांनी केली.
याप्रसंगी युवा नेते आशिष बांदल आणि ड्रायव्हर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवृत्ती बांदल म्हणाले, केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला मोठ्या प्रमाणात देशभरातून विरोध होत आहे. ड्रायव्हर्सने ट्रक, टेम्पो, कार, ट्रॅव्हल्स चालविल्या नाही, तर संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडेल. बांधकाम साहित्य, तरकारी, प्रवासी वाहतूक खोळंबून राहील.
याचा त्रास सामान्य नागरिकांना होईल. त्यामुळे कायद्यामधील त्रुटी दूर करून ड्राव्हर्सला संरक्षण मिळाले पाहिजे, असे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना देणार आहोत.
आशिष बांदल आणि काही चालक म्हणाले, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी उंड्रीमधील चालकांनी आंदोलन सुरू केल्यामुळे व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली. केंद्र सरकारने आणलेला नवीन कायदा हा वाहन चालकांच्या विरोधात आहे.