नवी दिल्ली -आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया ही विरोधी पक्षांची देशव्यापी आघाडी नववर्षातील जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जागावाटप निश्चित करणार आहे. जागावाटपासाठीची चर्चा प्रामुख्याने राज्य पातळीवर केली जाईल. पंतप्रधान पदाविषयीचा निर्णय निवडणुकीनंतरच घेण्याचे सूतोवाच आघाडीकडून करण्यात आले आहे.
दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये मंगळवारी इंडिया आघाडीची बैठक बोलाविण्यात आली होती. यात 28 पक्षांच्या नेत्यांनी भाग घेतला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आघाडीच्या पुढील वाटचालीची माहिती दिली. केंद्र सरकारने विरोधी पक्षांच्या खासदारांना निलंबित केले आहे. भारताच्या इतिहासात ही बाब पहिल्यांदाच घडली आहे. सरकारच्या या कारवाईविरोधात 22 डिसेंबरला देशभरात निदर्शने केली जाणार आहेत.
आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटपाच्या मुद्यावर बोलताना खर्गे यांनी सांगितले की, आघाडीतील पक्ष आधी राज्य पातळीवर जागा वाटपाची चर्चा करणार आहेत. काही जांगावरून प्रश्न निर्माण झाले तर त्याचा निर्णय आघाडीतील प्रमुख नेत्यांकडून घेतला जाईल.
आघाडीची चौथी बैठक
इंडिया आघाडीची ही चौथी बैठक होती. यापूर्वी पाटणा, बंगळुरू आणि मुंबईत बैठक झाली होती. आजच्या बैठकीत सकारात्मक अजेंडा निश्चित करणे, जागा वाटप, निवडणुकीची रणनीती नव्याने तयार करणे, जाती आधारित जनगणना, किमान आधारभूत मूल्य हमी, मजुरांना सामाजिक सुरक्षा आणि देशभरात संयुक्त सभा घेणे या मुद्द्यांवर चर्चा झाली.
बैठकीला कॉंग्रेस अध्यक्ष खर्गे, माजी अध्यक्ष अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी, संघटना महासचिव के.सी. वेणुगोपाल, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, राजीव रंजन सिंह, शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) च्या महबूबा मुफ्ती, अपना दलच्या (के) कृष्णा पटेल आणि पल्लवी पटेल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी सुप्रीमो ममता बनर्जी, तमिलनाडुचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, द्रमुकचे टीआर बालू, सीपीआई-एमचे सीताराम येचुरी, राजदचे तेजस्वी यादव, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि राम गोपाल यादव, सीपीआईचे डी राजा, नॅशनल कॉन्फरेन्सचे फारूक अब्दुल्ला, ईटी मोहम्मद बशीर, ई के इलांगोवन, आरएसपीचे एन के प्रेमचंद्रन, केरल कांग्रेस (एम) चे जोस के मणि, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि जेएमएमच्या महुआ माजी यांनी हजेरी लावली.