– वंदना धर्माधिकारी
“विसावा घेण्यासाठी थोडेसे थांबू या!’ असेच ओळींचे म्हणणे आहे. हे नुसते शब्द नव्हेत त्यात खूप काही भरलेले आहे. कुरुक्षेत्रावरील घनघोर युद्धाची सुरुवात कशी झाली हे प्रत्येकाला माहीत आहे. वाचनात तर नक्कीच आलेली असते, निदान कथानक तर ठावूक असणार. आठवले ना? दोन्ही बाजूचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले. परंतु भगवान सांगत बसले गीता. सुरू व्हायच्या आधीच युद्ध विसावू लागले. समजेना कोणाला युद्ध सुरू का केले जात नाही. तो विसावा म्हणजेच कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता. मानव जातीला जगण्याचे तत्त्वज्ञान असे युद्धभूमीवर कथन केले गेले होते. तेही युद्धास सज्ज रथात बसून. त्याचे महत्त्व आजच्या कलियुगात देखील आपण जाणतो, आचरणात आणायचा प्रयत्न करतो. भगवानाने युद्धाला दिलेले जगन्मान्य वळण म्हणजे गीताज्ञान होय. असे म्हणू शकतो.
भलेबुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर; जरा विसावू या वळणावर… या ओळी “तुझ्या वाचून करमेना’
चित्रपटातली सुधीर मोघे रचित गीताच्या आहेत. अनेकांना आवडणारे सुरेख गीत! प्रत्येकाच्या आयुष्यात अनंत वळणे येत असतात. वळणावळणाचेच तर आयुष्य असते. कोणी वळणावर थांबतो, क्षणिक मागे वळून बघतो, थोडी मान उंचावून दूर शोधू पाहतो, तर कोणाच्या लक्षातही येत नाही हे वळण येऊन गेले देखील. थोडेसे थांबून लेखाजोखा करून पुढे जायला हवे. काय सांगा पुढील आयुष्याचे वळण कदाचित सोयीचे होऊ शकेल. आपला अंदाज चुकीचा ठरून अर्थाचा अनर्थ देखील होईल. शेवटी कधी काय होणार एखाद्याचे नशिबात याचा अंदाज थोडाच लावता येतो. मग, कशाला थांबा आणि भूत भविष्य विहार करा. जगावा तो वर्तमानातील क्षण.
वळण आणि रस्ता, तो सुसाट वेगाने वाहणारा रस्ता असो नाहीतर शेतातून नदीकाठाने दूर नेणारी पाऊलवाट असो. दोहोंचे कार्य एकच. दोन्ही तिथेच असतात. त्यावरून चालणारा, पळणारा, नाहीतर एखाद्या सुसाट जाणारा माणूस असतो. रस्त्याची वळणं त्याला त्याच्या ठराविक जागी पोचवणार असतात, जर योग्य तऱ्हेने त्याने सगळी वळणे घेतली तर. पाहिजे ते वळण घेतले नाही तर इप्सितस्थळी पोहोचता येणार नाही. अथवा, फिरून फिरून सुरुवातीला चुकीच्या रस्त्यावरून वळणे वळणे घेत घेत थोड्या वेळाने योग्य ठिकाणी जाणे होते. रस्ता तिथेच असतो, पण म्हणतात “रस्ता चुकलो’. चुकतो तो माणूस, बरोबर वळण घेत नाही म्हणून. जसे इथे तसेच आयुष्याचे वळण होय. तिथेही काळ सरतो, तो धावतो, भले बुरे होतं राहते तेव्हा वळणे घेतली गेली नाही तर काय होते? चुकीचे होतेही. खापर नशिबावर फोडले जाते. आणि वर म्हणायचे जे होते ते चांगल्यासाठी होते.
मानव निर्मित वा एका मागून एक करीत मातीतून चालत जाताना होतात ते मार्ग. गर्दीच्या रस्त्यावरील स्पीड ब्रेकर सारखे. तसेच आता लिहिताना देखील काहीतरी कुठेतरी अडणार, अडथळे येणार. आत्ताच लिहावे का? की ते काम आधी करून मग लिहावे निवांतपणे. पण तेव्हा वेळ कुठला मिळणार. तर आत्ताच उरक. झालं, घ्यायचे वळण रद्द करून लागावे लिहायला. आपली विचारधारा अशीच वळणे घेतघेत कार्यरत असते. मी लागले लिहायला. ती लेखणी येईल आपोआप सलगी करायला. मग सुटेल गाडी. घेईल वळणे. खरंच की वळणावर थांबायचे नाही का? प्रत्येक वळणावर थांबले तर कसा लेख होईल. कुठे थांबायचे हे कसं समजणार? गफलत इथेच होते, जरा विसावू म्हणताना, “हे तुझे वळण आहे, तू थांब, घे विसावा,’ असे कोणी सांगत नाही. जगणे हे असेच असते नाही का? धुंद करणारा श्वास असतो तर कधी जीवघेणी ओढ असते. काय काय असते ते… वळणाचे कोडे म्हणजे जिणे!
जसे रस्त्यावर “थांबा’, “पुढे वळण आहे’, “अपघाती वळण’, “वर येणाऱ्याला आधी येऊ द्या’ अशा अनेकविध पाट्या आणि खुणा असतात. तशा आयुष्याच्या हमरस्त्यावरील वळणे सांगणारी पाटी ज्याची त्याने ओळखायची असते. तसे ठोकताळे असतात, जे इतरांचे तेच आपलेही असतात. बरेचदा वाटते, मला कोणी आधी जर सांगितले असते तर मी असे केले असते, तसे झाले असते. माझ्या आयुष्याला वेगळे वळण लागले असते. मीही काहीतरी करून दाखवले असते, अशी कुजले नसते. पण, आता काय उपयोग? तेव्हा का नाही कोणी समजावले मला? मी का नाही काही वेगळा विचार केला? अशी चुटपूट म्हणजे एका वळणाला वाघनखांनी ओरबाडलेला इतिहास असतो. माझी मजा, धावपळ, कुचंबना बघितली सगळ्यांनी. ही भावना बळावते, नाराजी वाढते. बोचरे वळण कायम सलत राहते. जाऊ दे म्हणून सोडून दिले पाहिजे. पण, इतके का सोपे असते जाऊ दे म्हणून सोडणे.
आयुष्यातली वळणे तर समजतात. जसजसे वय वाढते तशी वळणे वाढतात. कधी सुखाची कधी दु:खाची रडकी, कधी हळुवार कधी चुकार, कधी एकट्याची कधी इतरांबरोबर घेतलेली, कधी सामाजिक बांधिलकीची तर कधी अचानक देशावर येणाऱ्या संकटाची नकारात्मक वळणे. फक्त अपघाताच्या खाईत ढकलणारी वळणे. वळणावर गाडी नेताना थोडा वेग कमी करावा. थोडा श्वास घेऊन चौफेर नजर टाकावी, “का’ च्या बाराखडीतले प्रश्न स्वत:लासुद्धा विचारू नयेत. वळण वळणदार असते. ते घेताना काळजीने घ्यायचे असते. रेंगाळत नाही ते वळण. तेव्हा अतिशय वेगाने वळणावर वळण घेतना एखादे वेळेस अपघातही होऊ शकतो. काळजी घेतली नाही तर, सुसाट गेले तर अपघाताची शक्यता दाट असूही शकते. थांबा थोडं, बघा मागेपुढे.
का कोण जाणे, आयुष्यातले पहिलेच जन्माचे वळण प्रचंड वाकडे महाभयंकर ज्याचे होते, त्या कुंतीपुत्र कर्णाची आठवण एकदम झाली. समाजाला न पटणारे, आईला देखील पचवता न येणारे असल्याने आईने स्वहस्ते पुत्राचा त्याग केला आणि सोडले नदीच्या वाहत्या प्रवाहात. कालांतराने तोच समोर आल्यावर देखील त्याचा स्वीकार करायची हिंमत कुंतीमातेकडे नव्हती. ओळखलं तर खरं पण कसं बोलू, काय सांगू, यात अडकल्याने किती यातना झाल्या असतील तिला. तेच जर पहिल्या भेटीत तिने त्याला आपले पुत्र म्हणून स्वीकारले असते तर, कदाचित कर्णाच्या आयुष्याने किंबहुना संपूर्ण महाभारताने वेगळे वळण घेतले असते. पण, ज्या वळणावर जे व्हायचे ते टाळता येत नाही, हेच सत्य आहे.
त्यालाच भोग म्हणून स्वीकार करतो आपण. तेच सटवाईने लिहून ठेवलेले असते, कोणालाही न वाचता येणारी ती अनेकांची भाकिते. कोण तिला सांगते प्रत्येकाचे आयुष्य रेखाटायला? सगळेच अनुत्तरित. अनुत्तरित प्रश्नांनी फक्त धडकायचे असते. त्यात उभे राहा नाहीतर जमीनदोस्त व्हा. तुमच्या नशिबाचे ते खेळ बनून राहतात. जाऊ देत झालं… सहज डोकावला कर्ण मनात आणि मांडला इथे. इतकेच!
वळणावर अधूनमधून अंतर्मुख होऊन अवलोकन केले पाहिजे. चाचपणी करणे महत्त्वाचे. अशा परिस्थितीत काय उचित याची जाण व्यक्तीला परिपक्वता देणारी असते. मनाची चलबिचल होते, द्विधा मनस्थितीत कोणीतरी मार्ग दाखवणारा पाहिजे असे वाटले तरी भेटतोच असे नाही. तेव्हा आईवडील, घरातले, जवळचे असे कोणाशीतरी बोलावे. तरीही सगळेच विषय बोलता येत नाहीत. सांगणारे कोणी नाही, याचे दुष्परिणाम समाज भोगत आहे. याहीपेक्षा अधिक प्रमाणात परिस्थिती हाताबाहेर गेलेली अगदी शेवटच्या टोकाच्या क्षणी जगासमोर येते. सध्याच्या काळात कोणीच कोणाला काहीच सांगायला जात नाही, सल्ला द्यायचा नाही, अध्यात मध्यात नकोच नको. त्याने माणूस एकटा पडला आहे.
मी म्हणेल तेच बरोबर, अशा परिस्थितीला सामोरे जाताना चुकीचा निर्णय घेतला जातो. आधीच घरातली माणसे कमी, संवाद कामापुरता. दोघांची नोकरी, पैशाची मुबलकता आणि मुलांची कमी होत चाललेली संख्या. ते चित्र तर दिवसेंदिवस गडद होत आहे. तेव्हा सांगावेसे वाटते की, आईवडील कसेही असोत त्यांचा सल्ला घ्यावा, “काय करू?’ म्हणून त्यांना विचारावे. खरं तर पालकांनी मुलांच्या आयुष्यात थोडेतरी लक्ष घातले पाहिजे. “पुढची पिढी हुशार आहे, सगळे समजते त्यांना, आपण काय सांगणार.’ असे म्हणून मोठे लोक मुलांशी संवाद वरवर करतात. थोडे त्यांच्या कलेने, पुढील पिढीच्या विचारांची बैठक ठेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या मोठ्यांनी तर काय बिघडेल. मुलांनी देखील बोलावे आईवडिलांबरोबर. प्रत्येक वळणावर परिस्थितीचे गांभीर्य, अनुभवाने मिळालेले शिक्षण, दाखले मुलांना सांगायला हवेत. त्यांनी किमान त्यावर विचार करावा, इतपत तरी आईबाबांचा मुलांशी मोकळा संवाद व्हायला हवा. तेव्हा योग्य वळण देणे सोपे, सुकर होते. मुलांना आईबाबा नको असतात, असा गैरसमज जरा अधिक पसरत चालला आहे हे समाजाला लागलेले विचित्र कटू वळण आहे.
आता हेच बघा, मुलगी वयात येते तेव्हा आई तिला कितीतरी आधीपासून सगळं समजावून देत असते. किती अवघड वळणे असतात मुलींच्या आयुष्यात! पण आई सावरून घेते मुलीला, तीही समंजस होते. परंतु, मुलगा वयात येताना किती वडील त्याच्या या वळणावर त्याला त्याच्यातील बदलाची कल्पना देतात? फार थोडे, अगदी नगण्य बाबा असे असतील, बाकीचे बाप म्हणतात, “माझी चप्पल मुलाच्या पायात बसते, तो माझा मित्र झाला.’ आणि संध्याकाळी बरोबर बसायला कंपनी मिळाल्याच्या आनंदात त्याला दीक्षा देतात. चुकीचे विदारक चित्र हल्ली अनेकांच्या घरात दिसते. ते थांबवावयाचे प्रयत्न आई करू पाहते. बापलेक दोघेही तिच्या विरुद्ध बोलतात आणि ग्लास उचलतात. बाबा तिथे का नाही त्याला वळण लावत? अगदी हाताबाहेर गाडे जाते तेव्हा का डोळे उघडतात? आपल्या हातात असताना हातावर हात ठेवायचे, नंतर डोक्याला लावायचे. दुसरे असेही की आईवडील मुलांना मुलींना घाबरतात. थोडी मोठी झाली की जणूकाही त्यांना सगळी अक्कल आली, असे समजतात. त्यातून आपला शेवटचा पगार होता त्यापेक्षाही त्यांचा पहिला पगार अधिक असल्याने पालकांना मुलांशी बोलायची भीती वाटते. कर्तव्याला दोन्ही बाजू कमी पडतात हे सत्य आहे. भीतीपोटी मुलांना वळण लावायचे काम कुचकामी होते. सगळे असून नाते अधिक तकलादू होत आहे. हे वळण नक्कीच ठीक नाही. पुढचे होणारे परिणाम जीवघेणे देखील ठरतात. उपयोग काय? वेळ गेलेली असते.
ज्या घरात संवाद सकस तिथे आपोआप सगळ्यांच्या प्रत्येक वळणावर चर्चा होते, विचारविनिमय करून कुठला मार्ग बरोबर तोच मार्ग, तेच वळण घेताना ताण नसतो. नव्या जुन्या विचारांची सरमिसळ होते. शिवाय, भविष्यात काही चुकीचे झाले, त्रास झाला तर इतर सर्व पाठीशी उभे असतात. “आय’मध्ये केवढा मोठा आधार असतो. मोठे “असेट’ कमावणे असते. कमवायलाच हवे प्रत्येकाने ते असे. इथे आठवते कथालेखक व. पु. काळे यांचे एक वाक्य “जीवनात ओढ असावी’ पण ताण नसावा, आजकाल ओढ नाही पण ताण खूप आहे म्हणून सतत ओढाताण सुरू आहे.’ सगळे परिस्थितीच्या स्वाधीन असते हे खरे. तरीपण का उगा ताणाताण वाढवावी? एका बाजूने धागा सैल सोडला तर!
एखादा प्रसंग कोणा एकाचे आयुष्य बदलवीत असतो. लग्न हे तर खूप मोठे अवघड तरी सुंदर वळण समजले जाते. तर, तिथेच आयुष्याचे सार वाटते, संसार करताना सुखदु:ख जरी असले तरी दोन जीवांचे एकरूप होऊन आयुष्यात रंग भरणे असते. बालपण, शिक्षण, तारुण्य, नोकरी, व्यवसाय, भटकंती, निवृत्ती अशा अनेक वळणाच्या वर्तुळात गुंतून पडून संसारात आपण फिरत राहतो. आई बाप होता येणे यासारखे सुख नाही. ते मोठे ऐश्वर्य ही देवाची देणगी आहे. आयुष्यातील प्रत्येक वळणावर भेटतात अनेकजण. साथ, आपलेपण, ओलावा, शब्दांची फुंकर हवी असते. तेव्हा कितीही अवघड वळण येऊ देत वळणावर घसरणार नाही, असा विश्वास मिळावा लागतो. वळणावर वाट बघणारे देखील भेटतात ना.
एकुणात काय निष्पन्न होते, इथे शब्दांचे विच्हाद्न करून? एका गीताच्या ओळीने सुरुवात केली खरी. विचारांचे धागे पांगत गेले. गुंतागुंत होते ना अशा धाग्यांची. तसे कितीतरी गीते, सुविचार, शब्द संग्रह आपल्याला आयुष्यात सावरायला मदत करतात. याचे भान आले. “जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधूनी पाहे’- संत समर्थ रामदास. “ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान’- संत तुकाराम महाराज. “एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे’- ग. दि. माडगुळकर. शब्दांची ताकद मोठी किमया करू शकते. शब्दसंपदा, सुरेख शब्दांकन मनावर अधिराज्य चालवते. “मरावे परी कीर्तिरूपे उरावे’- खरे आहे हेही वचन. आला, जगला आणि मेला एका दिवशी काय अर्थ आहे त्यासी? “जन पळ भर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय?’ किती काय काय शिकवितात हेच शब्द. यासी नसे अंत. शब्दांचे सामर्थ्य जाणून आपले आयुष्यात सुखाची पेरणी करावी. पेरणी केली, फळ मिळाले, आयुष्य फुलले, आनंदाने बहरले तर इथेच स्वर्ग पाहावा. रसरशीत समरसून जगणे एक समृद्ध वळण होय.
कधी कधी अचानक आपले आयुष्य सुंदर वळण घेते. ध्यानीमनी नसताना काहीतरी गवसते, आपण ते फुलवीत जातो. समाधान मिळते तेव्हा फक्त आनंदी आनंद! काही करायचे ठरवलेले नसते. पण, एखाद्या वळणावर क्षणिक थांबलो असताना कोणीतरी खुणावते आपण तिकडे वळतो आणि वाट मिळते, बहर येतो. हेच असते, चला विसावू या वळणावर! अशीच एका वळणावर मला भेटली माझी लेखणी. तीच कधी कधी सरसर पळते, मी शब्दांत मांडते. तर एकदम थांबा येतो आणि थांबावे इथेच असे मन बोलते. आत्ता तेच झालं किती लिहिले तरी संपणारा विषय थोडाच आहे हा? मलाच मी केलेला प्रश्न “आ’ वासतो म्हणून मीही याच इथे या वळणावर थांबते. माझे विचार तुम्हाला वाचायला देण्यासाठी! प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेतला थांबा! पण, तुमच्या वाचनानंतर मला आनंद देणारा, काहीतरी शिकवणारे ते वळण असेल.