भोर तालुक्यात काढणीस तुरंब्या झडल्याने नुकसान
भोर – भोर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भात काढणीची लगबग सुरू असताना बुधवारी (दि. 8) सकाळी अचानक पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भोर तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मांढरदेवी (ता. वाई) च्या दिशेने तालुक्याच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
यावेळी काढणीस आलेल्या हळव्या जातीच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर गरव्या भात पिकांची खाचरांत लोळवण झाली असून, तुरंब्याच्या भाताची गळती झाली आहे.
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी सकाळीच शेतात जाऊन कापणी केलेल्या भाताच्या पाती जमवत असताना अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे वावरात काढून ठेवलेला भात, मळणीसाठी जमून ठेवलेला भात, तर काही ठिकाणी भाताचे पेंढे भिजल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आधीच निसर्गाची अवकृपा असताना शेतकरी पिचला असताना त्यात या पावसाची भर पडली आहे.
भोर तालुक्याच्या दक्षिण भागातील वरवडी खुर्द वरवडी डायमुख, वरवडी बुद्रुक, अंबाडे, बालवडी, पाले, पळसोशी, बाजारवाडी, धावडी, खानापूर, हातनोशी, गोकवडी, नेरे, भोर या भागात अवकाळी पावसाने सकाळी जोरदार हजेरी लावली. हा पाऊस रब्बी हंगामातील पेरणीला झालेल्या ज्वारी, हरभरा, भुईमुग आदी पिकाला मात्र, फायद्याचा ठरला आहे.
दुपारनंतर अवकाळी पावसाने दिशा बदलल्यामुळे अंबवडे खोऱ्यातील पिसावरे, वाठार, नांदगाव आपटी, रावडी, टीटेघर, कोरले, रायरी, वडतुंबी, कर्णवड या भागात भात पिकांला फटका बसल्याने हातातोंडाशी आलेल्या घास वाया जाणार आहे. हिरडस मावळ खोऱ्यात भात काढणी झाली असून, जनावरांसाठी ठेवलेला पेंढा भिजून गेल्यामुळे तो खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे जनावरांच्या चाऱ्याची टंचाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दैना उडविली आहे. यामुळे शेतीचे नुकसानकारक ठरणार असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले.
निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे पिकांना खऱ्या पावसाची गरज असते तेव्हा पाऊस गायब होतो आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचे काम आवकाळी पाऊस करत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
भात पिकांचा शासनाने त्वरीत पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
– सचिन थोपटे, शेतकरी, खानापूर