नवी दिल्ली – कोणत्याही संस्थेच्या सर्वोच्च पदावर पाहोचण्यापर्यंतच्या प्रवासादरम्यान प्रत्येक व्यक्तीला कोणत्या न कोणत्या आव्हानाचा सामना करावाच लागतो. आपणही आपल्या आयुष्यात कठीण परिस्थितीचा सामना केला आहे असे प्रतिपादन भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था अर्थात इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी केले आहे.
सोमानाथ यांनी निलावु कुदिचा सिम्हंगल (हिंदी अनुवाद: शेर जिसने चांदनी पी ली) हे आत्मचरित्र लिहिले असून इस्त्रोमधील आपल्या दशकांच्या वाटचालीत त्यांनी कोणकोणत्या आव्हानांना तोंड दिले त्याचा लेखाजोखा यात मांडला आहे. आपले हे पुस्तक कोणा व्यक्तीच्या विरोधात नसल्याचे त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तीला अनेक अवघड स्थितींना सामोरे जावे लागते. ही अशी स्थिती असते की ज्यातून प्रत्येकालाच जावे लागते. संघटनेत पद मिळवणे हे आव्हान त्यापैकीच एक. त्या पदासाठी एकापेक्षा अधिक व्यक्ती पात्र असतात. मी केवळ तो खास मुद्दा समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात कोणा व्यक्तीला टार्गेट केलेले नाही.
भारताची चांद्रयान 2 मोहीम अपयशी ठरली होती. त्याबाबतच्या घोषणेतील स्पष्टतेच्या अभावाचा पुस्तकात उल्लेख असल्याचे सोमनाथ यांनी मान्य केले. लॅंडीगच्या वेळी मोहीम अपयशी ठरली आहे आणि यान दुर्घटनाग्रस्त होणार आहे याचा स्पष्ट उल्लेख केला गेला नव्हता.
प्रत्यक्षात काय झाले हे स्पष्टपणे सांगणे ही चांगली परंपरा आहे असे माझे मानणे आहे. तसे केले तर संस्थेत पारदर्शकता वाढते. त्यामुळे या विशिष्ट घटनेचा मी पुस्तकात उल्लेख केला असल्याचे त्यांनी नमूद केले. आयुष्यात अडथळे पार करून, आव्हानांना सामोरे जाऊन, कोणावर टीका न करता काही साध्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रेरित करण्याचा हे पुस्तक एक प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले.