– हेमंत देसाई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मध्य प्रदेशचा दौरा केला. गेल्या सहा महिन्यांतील त्यांचा हा सातवा दौरा होता.
नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेश दौरा केला आणि “कार्यकर्ता महाकुंभ’ या कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच मध्य प्रदेश निवडणुकीच्या प्रचाराचा नारळही फोडला. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार असून, मोदी यांनी “हर घर गॅरेंटी, पुरी होने की गॅरेंटी है. जब मोदी गॅरेंटी देता है तो वो जमीन पर उतरती है. घर घर पहुँचती है’, असे म्हणत त्यांनी भाजपला मते देण्याचे आवाहन केले. तसेच “कॉंग्रेस अब कॉंग्रेस के नेता नही चला रहे है.
कॉंग्रेस एक कंपनी बन गई है. नारों से लेकर नीतीतक हर चीज आउटसोर्स कर रही है. ये ठेका अब कुछ अर्बन नक्षलियों के पास है’ अशा तिखट शब्दांत कॉंग्रेसवर टीका केली. विधानसभेत जर कॉंग्रेसने भाजपचा पराभव केला, तर लोकसभेतील भाजपच्या जागाही कमी होतील आणि मग केंद्रातील आपल्याला चांगले बहुमत प्राप्त होईल की नाही, अशी शंका भाजपच्या नेतृत्वाला वाटत आहे.
मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा आहेत. 2019 मध्ये लोकसभेच्या 29 पैकी 28 जागांवर भाजपचे खासदार निवडून आले आहेत आणि छिंदवाडाच्या एका जागेवर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे चिरंजीव नकुलनाथ हे खासदार आहेत. पण 2019 मध्ये असलेली मोदी यांची लोकप्रियता आता काही प्रमाणात कमी झाली असल्याचे पाहणी अहवाल सांगतात.
तसेच मध्य प्रदेशात कित्येक वर्षे भाजपची सत्ता असून, त्यामुळे साहजिकच अँटी इन्कमबन्सीची लाट येणे शक्य आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपने कॉंग्रेसमधून पक्षात घेतले आणि केंद्रात मंत्रिपद दिले, पण त्यांचा प्रभाव ग्वाल्हेर परिसराबाहेर नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये भाजपला कॉंग्रेसने चांगलीच टक्कर दिली.
कमलनाथ यांची दोन वर्षे वगळली, तर मागची सोळा वर्षे शिवराज सिंह हेच मुख्यमंत्रिपदावर आहेत. परंतु त्यांच्याबाबत केंद्राला भरवसा वाटत नसल्यामुळे, लोकसभेच्या सात खासदारांना आणि त्यातही तीन केंद्रीय मंत्र्यांना भाजपने विधानसभेच्या लढाईत उतरवले आहे. नरेंद्रसिंग तोमर, प्रल्हाद पटेल आणि भगतसिंग कुलस्ते हे केंद्रीय मंत्री तसेच पक्ष संघटनेतील बडे नेते कैलास विजयवर्गीय यांना विधानसभा लढण्यास सांगण्यात आले आहे.
या नेत्यांमुळे त्यांच्या मतदारसंघाच्या पलीकडे सगळ्या जिल्ह्यात व विभागात त्याचा फायदा मिळेल, असा भाजपचा हिशोब आहे. कर्नाटकात तत्कालीन मुख्यमंत्री बोम्मई यांना निवडणूक प्रचारात फारसे महत्त्व देण्यात आले नव्हते. तिकीटवाटपात त्यांना विचारण्यातही आले नव्हते. त्याचप्रमाणे शिवराज यांनाही पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत सध्या फारसे स्थान नाही. मोदींच्या नावावर मते मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
उद्या समजा निवडणुकांनंतर राज्यात भाजपची सत्ता आल्यास, आपण मुख्यमंत्री असणार नाही असे वाटून, शिवराज हे जाहीर सभांमध्ये अनेकदा भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवराज हे चार वेळा मुख्यमंत्री बनले असून, मध्य प्रदेशात त्यांना “मामा’ असे प्रेमाने संबोधले जाते. बुधनी हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. गेल्या मंगळवारी तेथे प्रचारसभेत भाषण करताना, “मी निवडणूक लढवावी की नाही?’ असे त्यांनी उपस्थित जनसमुदायाला विचारले. सिहोर हा त्यांचा होम डिस्ट्रिक्ट आहे. तेथील सभेत भाषण करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “जेव्हा मी या पदावरून जाईन, तेव्हा आणि त्यानंतर लोक माझी आठवण काढत राहतील.’
इंदोरमध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघात घेतलेल्या सभेत बोलताना विजयवर्गीय म्हणाले की, “मला आमदारकीची निवडणूक लढवण्यास सांगितले आहे, ते पुढे राज्यात महत्त्वाची जबाबदारी घेण्यासाठीच!’ याचा अर्थ उघड आहे. विजयवर्गीयांना मुख्यमंत्रिपदाची आस लागून राहिली आहे. ज्या केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेची निवडणूक लढवण्यास सांगितले आहे, त्यांच्याही महत्त्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत. मुळात शिवराज हे लालकृष्ण अडवाणी यांचे निकटवर्तीय समजले जातात.
मोदी यांच्याशी त्यांचे संबंध फारसे सलगीचे नाहीत. मागच्या वेळेस त्यांना कदाचित दूर केले जाईल, असे वाटत होते. परंतु त्यावेळी चुरशीची लढाई असल्यामुळे शिवराज सिंह यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका लढवण्यात आल्या. परंतु सरकार मात्र कॉंग्रेसचे आले आणि नंतर फोडाफोडी करून, पुन्हा एकदा शिवराज हे मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाले. शिवराज हे सध्या दररोज किमान दोन ते तीन प्रचारसभा घेत असून, 18 वर्षांतील आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीची माहिती ते लोकांना देत असतात. बुऱ्हानपूर येथे “लाडली बहना’ हा कार्यक्रम झाला, तेव्हा “मी जरी शरीराने बारीक असलो, तरी मी टक्कर मात्र ताकदीने देतो’ असे ते म्हणाले.
“हे जग सोडून जाण्यापूर्वी, राज्यातील प्रत्येक बालिकेला सन्मानपूर्वक जीवन जगता येईल अशी व्यवस्था मी करून जाईन’ असे भावनिक उद्गारही त्यांनी काढले. आता तर “मी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे की नाही?’ आणि “भाजपाला सत्ता मिळावी की नाही?’ असे प्रश्न ते थेट लोकांना विचारत असतात. या सगळ्यावरून शिवराज यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला असावा, असे वाटत आहे. मात्र एकप्रकारे पंतप्रधानांवर मानसिक दबाव आणून आपल्याला नेतृत्वाची संधी मिळावी, असा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे. आपल्या सभांमधून मोदी यांनी शिवराज यांचा उल्लेख करणे जवळपास थांबवले आहे, हेसुद्धा सूचक आहे.
ज्याप्रमाणे कर्नाटकात येडुयुरप्पा यांना बाजूला टाकण्यात आले, त्याचप्रमाणे शिवराज यांना निवडणुकीपूर्वीच कोपऱ्यात ढकलण्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. “मामाने चांगले काम केले आहे की नाही?’ आणि “उत्तम कामगिरी बजावली असेल, तर मी मुख्यमंत्री का होऊ नये?’ असा सवालच शिवराज आज जनतेस विचारू लागले आहेत. या परिस्थितीचा फायदा कॉंग्रेस उठवत असून, शिवराज यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळण्याची सुतराम शक्यता नाही, असे कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. एरवी कॉंग्रेसमध्येच दिसणारी गटबाजी व सत्तास्पर्धा आता भाजपमध्ये दिसू लागली आहे. मध्य प्रदेशात भाजप व कॉंग्रेस यांच्या मतांच्या टक्केवारीत अत्यल्प फरक आहे. त्यामुळे शिवराज यांच्या नाराजीचा भाजपला फटका बसण्याचीच अधिक शक्यता आहे.