पुसेगावला 43 व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन
पुसेगाव – सध्याच्या बदलत्या काळात पारंपरिक शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. त्यांचे भविष्यकालीन जीवन सुकर होण्यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी मांडले.
पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवाजी विद्यापीठाच्या 43 व्या सातारा जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड, बीव्हीजीच्या संचालिका वैशाली गायकवाड, विविध कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. गायकवाड म्हणाले, “”युवकांमध्ये एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून युवा महोत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जात आहे. यातून देशातील संस्कृती,परंपरा जतन आणि संवर्धन होत आहे, ही वाखण्याजोगी बाब आहे.”
श्री. दळवी म्हणाले, “”विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रत्येक कॉलेजमध्ये सांस्कृतिक किंवा वाङ्मय मंडळ असतंच. युवा महोत्सवात विद्यार्थ्यांमधील चांगले कलागुण शोधून त्यांच्या गुणवत्तेचा उपयोग करिअर घडवण्यासाठी केला तर ते जीवनात नक्की यशस्वी होतील.” डॉ. पी. टी. गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक डॉ. प्रा. राजेंद्र भोसले यांनी केले. सूत्रसंचालन मनुजा सोनार, सुधीर धोंगडे यांनी केले. विश्वस्त प्रा. डॉ. संजय क्षीरसागर यांनी आभार मानले.
सूरतालात रंगली तरुणाई
पुसेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयातील एकदिवसीय जिल्हा युवा महोत्सवात जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला आहे. एकूण 15 कला प्रकाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणाई सूर तालात रंगली आहे.