मुंबई – कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यातील सरकारी दवाखाण्यातील स्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या या सर्व मुद्यांवरून नाना पटोले यांनी सरकारवर जहरी केली आहे. आज पुण्यात काँगेसतर्फे पश्चिम महाराष्ट्र जिल्हा विभाग निहाय बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. नाना पटोले यांनी महाराष्ट्र सरकार सेल्फिश सरकार आहे आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री पदावर डोळा असल्याचे म्हंटले आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
सर्व सामान्य लोकांना जगू न देणे ही भाजपची प्रवृत्ती आहे. भाजप राहुल गांधी यांना जर रावण म्हणत असतील तर महागाई, बेरोजगारी कोणी वाढवली? असा सवाल त्यांनी विचारला. तसेच काँग्रेस आता भाजपच्या रावण प्रवृत्तीचा चेहरा दाखवण्यासाठी राज्यभर दौरे करणार, असेही नाना पटोले यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, “राज्यात नागरिकांचा सरकारी दवाखान्यांमध्ये मृत्यू होत आहे. शेतकरी मरत आहेत, मात्र राज्य सरकारला कोणाचीच चिंता नाही. उलट महाराष्ट्र सरकार सेल्फिश सरकार आहे आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री पदावर डोळा आहे,” अशा शब्दात नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला.
राहुल गांधी यांचा ‘नवीन युगाचा रावण’ असा उल्लेख
काही दिवसांपूर्वी भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर (एक्स) हॅंडलवर काॅंग्रेस खासदार राहुल गांधी यांचा सात डोके असलेला फोटो शेअर करत ‘नवीन युगाचा रावण’ असा उल्लेख केला होता. “नवीन युगाचा रावण आला आहे. तो दुष्ट आहे. धर्मविरोधी. राम विरोधी. भारताचा नाश करणे हे त्यांचे ध्येय आहे.”, असे ट्विटमध्ये लिहिले होते.
राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी भाजपने फोटोशॉप केलेल्या छायाचित्राचा वापर केला असून, त्यात राहुल गांधी यांची सात शीर दाखवण्यात आले. त्यांच्या कपड्यांवरही योद्ध्याचे चित्रण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान, काही महिन्यांत मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम या राज्यातील विधानसभा निवडणुका आहेत. तर 2024मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर एनडीए, इंडिया आघाडी, विशेषत: भाजप आणि काँग्रेसकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे.