मुंबई : माळीण, तळीयेनंतर गुरुवारी मोरबे डॅम परिसरातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या इर्शाळवाडी या टुमदार गावामध्ये दरड कोसळून डोंगराचा कडा खाली आला आणि त्यात 30 ते 40 घरे नागरिकांसह गाडली गेली. मागील काही वर्षांमध्ये पश्चिम घाटातील पर्वतरांगांमध्ये भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात अनेकांचा जीव गेलाय मात्र हे प्रकार घडल्यानंतर त्यावर उपाय करणे आणि लोकांना मदत जाहीर करणे एवढ पुरेसे नाही. या घटनांमागचे मूळ शोधणे गरजेचे आहे.
पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांच्या मते, पश्चिम घाटातील पर्वतरांगांमध्ये भूस्खलनाच्या घटनांमधे मागील दहा वर्षांत शंभर पटीने वाढ झाली आहे. भूगर्भशास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात हे स्पष्ट झाले आहे. पर्यावरणात होत असलेले बदल आणि मानवी हस्तक्षेप हे दोन्ही याला कारणीभूत आहेत. अनेक ठिकाणी वस्त्या निर्माण झाल्या आहेत. त्या वस्त्यांच्या आजूबाजूला दरड कोसळली की अनेकांचा नाहक जीव जातो. त्यामुळे संवेदनशील क्षेत्रातील वस्त्यांमधील नागरिकांना दुर्घटनेचा मोठा धोका असतो.
गाडगीळ समितीने 2011 साली याबाबतचा अहवाल सादर केला होता. मात्र आजवर तो स्वीकारण्यात आलेला नाही. या अहवालात अतिसंवेदनशील भाग कोणते हे नक्की करण्यात आले आहे आणि त्या भागांमधे रस्ते, दगडखाणी यांसारख्या मानवी हस्तक्षेपाला पूर्णपणे बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मानवी वस्तीचे स्थलांतर हा यावर उपाय असू शकत नाही. कारण पुनर्वसनाचे प्रश्न वर्षानुवर्ष रखडतात. त्यामुळे यावर ठोस उपाय शोधणे गरजेचे आहे.
गाडगीळ समितीच्या अहवालात काय?
पश्चिम घाटातील पर्वतरांगांमध्ये संवेदनशील आणि अतिसंवेशदनशील परिसर सांगण्यात आले आहेत.
याच परिसरात वस्ती, रस्ते आणि मानवी हस्तक्षेप टाळायला हवा.
वस्त्यांमधील नागरिकांनी आणि प्रशासनाने मिळून निर्णय घ्यायला हवा.
भूस्खलनाच्या घटनांमधे मागील दहा वर्षांत शंभर पटीने वाढ झाली आहे.
भागांमधे रस्ते, दगडखाणी यांसारख्या मानवी हस्तक्षेपाला पूर्णपणे बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे
इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर सर्व अडथळ्यांवर मात करीत मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच श्वान पथक सुद्धा घटनास्थळी पोहोचले आहे. घटनास्थळ हे अतिदुर्गम भागात असल्याने कोणतीही वाहनाने घटनास्थळी पोहोचणे अशक्य असल्याने डोंगर पायथ्याशी तात्पुरता नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री