नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमध्ये एकाच महिलेने 20 पुरुषांना फसवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बॉलिवडमध्ये गाजलेल्या “लुटेरी दुल्हन’ या सिनेमाप्रमाणे या महिलेने या सर्व पुरुषांशी विवाह करून त्यांची फसवणूक केली.
एकापाठोपाठ एक 20 युवक आपली पत्नी हरवली असल्याची तक्रार घेऊन पोलिसांकडे गेल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. कारण या सर्वांनी दाखवलेल्या आपल्या पत्नीचा फोटो हा एकाच महिलेचा असल्याचे पोलिसांच्या ध्यानात आले. एकाच मध्यस्थ व्यक्तीने या सर्वांना विवाहासाठी या महिलेच्या स्थळाचा प्रस्ताव पाठवला होता. विवाह निश्चित करण्यासाठी या मध्यस्थाला 2 लाख रुपये दिल्याचे एका पुरुषाच्या पित्याने सांगितले.
विवाह निश्चित करण्यास हा मध्यस्थ टाळाटाळ करत होता. विवाहाचे स्थळ देखील निश्चित झाले होते. पण अचानक वधूचा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आणि मध्यस्थाला दिलेली निम्मी रक्कम परत दिली गेली. पण थोड्याच वेळात ही निम्मी रक्कम देखील परत मागितली गेली आणि दुसऱ्याच मुलीचा फोटो दाखवला गेला. या दुसऱ्या मुलीशी विवाह केला गेला. पण दोनच दिवसांनी ही दुसरी मुलगीही आजारी असल्याची बतावणी करून माहेरी निघून गेली. ती परत आलीच नाही. जाताना ती आपल्याबरोबर दागिनेही घेऊन गेली.
याच सुमारास या मुलीचा दुसऱ्या व्यक्तीशी विवाह झाल्याचे नंतर निष्पन्न झाले. याच मुलीचा आणखीन काही जणांबरोबर निकाह झाल्याचे पोलिसांना लक्षात आले. ही मुलगी रातोरात घरातील सर्वकाही घेऊन कोणालाही न सांगता निघून गेली होती.