बारामती (प्रतिनिधी) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच कर्नाटक मधील सर्व महिलांना एसटीचा मोफत प्रवास दिला जात आहे. ऑगस्ट पासून महिन्याला महिला कुटुंब प्रमुखाच्या खात्यावर दोन हजार रुपये सरकार जमा करणार आहे. महाराष्ट्रात आगामी काळात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आल्यास कर्नाटक मध्ये महिलांना ज्या सुविधा दिल्या जात आहेत त्या सुविधा महाराष्ट्रात लागू करण्यात याव्या अशी अपेक्षा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली.
अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या वतीने विश्वासराव देवकाते यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंती उत्सवाचे आयोजन शहरातील शारदा प्रांगण येथे केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या बोलत होते. समाजभूषण पुरस्कार देऊन सिद्धरामय्या यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास राज्याची विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे ,आर.व्ही. देशपांडे,आमदार बाळासाहेब थोरात,आमदार दत्तात्रय भरणे, रवींद्र धंगेकर, माजी आमदार आरजे रुपनवर, विजय मोरे, उत्तम जानकर, संजय जगताप, दिगंबर दुर्गाडे, पुरुषोत्तम जगताप, प्रमोद काकडे , मदनराव देवकाते,राजवर्धन शिंदे किरण गुजर, संभाजी होळकर, सचिन सातव, जय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सिद्धरामय्या म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रशंसा जगभरात केली जाते. महिलांना शिक्षण मिळावे त्यांचे सबलीकरण व्हावे तसेच त्या सामर्थ्यवान व्हाव्यात यासाठी अहिल्यादेवी यांनी काम केले. कर्नाटक मध्ये सत्ता आल्यानंतर निवडणुका पूर्वी जनतेला जे आश्वासन दिले होते त्या आश्वासनांची पूर्ती केली. महिलांना मोफत एसटी प्रवास असे जाहीर केले होते सरकार आल्यानंतर 24 तासात निर्णय घेऊन योजना कार्यान्वित केली.
महिला कुटुंबप्रमुखाच्या खात्यावर महिन्याला दोन हजार रुपये जमा केले जातील असे जाहीर केले होते ऑगस्टपासून ही योजना कार्यान्वित होईल. असे सांगत महाराष्ट्रात देखील काँग्रेस राष्ट्रवादी सरकार आल्यानंतर अशा प्रकारच्या योजना लागू कराव्यात आशी आपेक्षा सिद्धारामय्या यांनी शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली.
शरद पवार म्हणाले अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यसत्ता सामान्य जनतेसाठी राबवली त्याचप्रमाणे हातात आलेली सत्तेचा उपयोग सिद्धारामयादेखील सामान्य जनतेच्या सन्मानासाठी करत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची नोंद कर्नाटकच्या जनतेने घेतले आहे. त्यांचा आदर्श आपण देखील घेतला पाहिजे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
जे कर्नाटकत झाले ते महाराष्ट्रात देखील होऊ शकते..
धनगर, मराठा, मुस्लिम ,लिंगायत समाजाला आरक्षणाची गरज आहे. याबाबत संसदेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले आहेत. आरक्षण द्यायचे नाही या मानसिकतेत भाजप सरकार आहे. गेली नऊ वर्ष सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. उत्तर मात्र मिळत नाही. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ताकतीने लढू. आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी धनगर समाजाला दिला.