मुंबई -सातत्याने अपयशी ठरत असलेला व नेतृत्वातही कमी पडत असलेल्या रोहित शर्माची कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी होण्याचे संकेत बीसीसीआयकडून मिळत आहेत. त्याच्या जागी पुन्हा एकदा विराट कोहलीचाच विचार सुरू असला, तरीही भविष्याची तरतूद म्हणून अजिंक्य रहाणे आणि शुभमन गिल यांचीही नावे चर्चेत आहेत.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला फार काही यश हाती लागले नाही. भारतीय संघाला नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपदही मिळवता आले नाही. तसेच नेतृत्वाची धुरा सोपवल्यापासून त्याची वैयक्तिक कामगिरीही खालावली आहे. त्यामुळेच बीसीसीआय नवा विचार करत आहे. रोहित अंतिम संघ निवडतानाही चुकला होता, तसेच त्याने जबाबदारीने खेळ करणेही गरजेचे होते. प्रतिष्ठेच्या लढतीत लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्याने निवड समितीनेच रोहितकडून नेतृत्व काढून घेण्याची मानसिकता बोलून दाखवली आहे.
रोहित सध्या भारताच्या तीनही प्रकारातील संघांचा कर्णधार आहे. जागतिक कसोटी मालिकेचे पुढील वेळापत्रक 2023 ते 2025 असे आहे. यासाठी भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व कोणाकडे सोपवण्यात येईल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कोहलीने 2022 साली कसोटी संघाचे नेतृत्व सोडले होते. अर्थात तो पुन्हा नेतृत्व स्वीकारण्यास तयार होणार की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळेच अजिंक्य रहाणे किंवा नवोदित गिल यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात यावी, अशी सकारात्मक चर्चा निवड समितीत सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
अनुभव निर्णायक ठरेल
रहाणेने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. भारताने 2020-21 साली ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करण्याची किमया त्याच्याच नेतृत्वात केली होती. कोहलीच्या अनुपस्थितीत त्या संघाचे नेतृत्व रहाणेने केले होते. त्यामुळे तब्बल 18 महिन्यांनंतर कसोटी संघात परतलेल्या रहाणेकडेच कसोटी संघाचे नेतृत्व सोपवले जाण्याची दाट शक्यताही वर्तवली जात आहे.