पुणे : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला गालबोट लागणारा प्रकार समोर आला आहे. रविवारी दुपारी चारच्या सुमारास पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन झटापट झाली. यामध्ये पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे किरकोळ झटापट झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेवर आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे. या घटनेवरून शिंदे फडणवीस सरकारवरही विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका केली आहे.
अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना यावर कुठल्याही पक्षातील नेत्यांनी राजकारण करू नये असे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले,’आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका. आपल्यासाठी वारकऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्यावर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या, तशी स्थिती निर्माण होऊ नये, याला पोलिसांचे प्रथम प्राध्यान्य होते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे सांगितले.’