मुंबई : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला गालबोट लागणारा प्रकार समोर आला आहे. रविवारी दुपारी चारच्या सुमारास पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन झटापट झाली. यामध्ये पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता या सर्व प्रकरणातील दुसरी बाजू समोर येत आहे. पोलिसांना रेटून वारकरी पुढे जात असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
रविवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्तानावेळी मंदिराच्या बाहेर पोलीस आणि तरुण वारकरी समोरासमोर आले होते त्यांच्यात झटापट झाली होती.आळंदीमधील आणखी व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पोलीसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असतांनाही काही तरुण वारकरी हे नियम डावलून पोलिसांना ढकलत, तुडवत मंदिराच्या दिशेने धावत असल्याचं पाहायला मिळत आहे.
संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या समोर काही तरुण मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अडवताना पोलिसांनी सौम्य लाठीमार केला होता. मात्र तो लाठीमार झालेला नाही, किरकोळ झटापट झाल्याचा खुलासा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केला होता. तर विरोधी पक्षांनी या घटनेवरुन राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. असे असतांना रविवारच्या घटनेचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे या सर्व वादाला आणखी वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.