राहाता – गणेश कारखाना सुरू करून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. विरोधकांच्या ताब्यात जर हा कारखाना असता तर त्यांनी तो कधीच बंद करून खोलून नेला असता. विरोधकांना निवडणूक जवळ आली की मतदारसंघातील जनतेची आठवण येते. जिल्ह्यात राहाता तालुका टॅंकरमुक्त असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगत जनतेच्या अडचणी जाणून घेतल्या.
माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ व राहाता सोसायटीचे माजी चेअरमन स्वप्नील गाडेकर यांच्या निवासस्थानी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागरिकांबरोबर संवाद साधून शासन आपल्या दारी योजनेची माहिती दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी तुषार आहेर, गणेशचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, भाऊसाहेब जेजूरकर, डॉ. के. वाय. गाडेकर, ऍड. रघुनाथ बोठे, नानासाहेब बोठे, कैलास सदाफळ, संजय सदाफळ, भास्करराव सदाफळ, स्वप्नील गाडेकर, सोसायटी चेअरमन सुरेश गाडेकर, ज्ञानेश्वर सदाफळ, वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने आदी उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले की, शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी सातत्याने मोठ्या प्रमाणात विकासकामांकरिता निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे, तसेच मागील महिन्यात 14 कोटी निधी या कामांसाठी दिला असून, विविध मूलभूत गरजा लक्षात घेऊन नगर परिषदेने मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू केली आहेत. शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार अजून विकासकामांकरिता मोठ्या प्रमाणात निधी देऊन विकासकामे तत्काळ केली जाणार आहे.
लवकरच एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सर्व दाखले एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न सुरू असून त्याची लवकरच अंमलबजावणी होईल, असे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी 413 लाभार्थींना मंत्री विखे यांच्या हस्ते तत्काळ 21.30 लाखांचा धनादेश देण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी दिली.