– अरुण गोखले
माणसाला मिळणारा मनुष्यजन्म हा कोणत्या जाती, धर्मात आणि पंथात मिळणे त्याच्या हातात नसते. एकदा माणूस म्हणून जन्मास आल्यावर आणि शेवटी आपण माणूस म्हणून जरी मरणार असलो, तरी एक माणूस म्हणून जगताना आपण आपला माणसाचा रोकडा धर्म हा पाळायलाच हवा. आता हा माणसाचा रोकडा धर्म कोणता? हे सांगण्याचे आणि माणसा माणसातील माणूसपण जागविण्याचे महत्त्वपूर्ण असे कार्य राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी केले. आपल्या सभोवतीच्या समाजबांधवांना माणसाचा नेमका रोकडा धर्म त्यांनी समजावून सांगितला. समाजातला प्रत्येक माणूस हा त्याच्या कर्तव्य भावनेने जागवताना त्याला त्याचा रोकडा माणूस धर्म समजावून देतात. हीच शिकवण आजही मोलाची आहे. मानवी जीवन उजळणारे ते त्यांचे शब्द म्हणजे जणू समाजास नवजीवन देणारे अमृतकणच आहेत.
बाबा लोकांना सांगतात की, बाबाहो! तुम्ही तुमच्या भवतीच्या भुकेलेल्यांना अन्न द्या. तहानलेल्यांना पाणी द्या. ज्यांना वस्त्र नाही त्यांना कपडे द्या. ज्यांना घर नाही त्यांना निवारा द्या, आसरा द्या. गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करा. बेरोजगार आणि काम नसलेल्या हातांना काम द्या. अंध, अपंग, रुग्ण यांची सेवा करा. मुक्या प्राण्यांची हत्या करू नका, त्यांना अभय द्या. गरीब तरुण-तरुणी यांचे लग्न लावून त्यांचे संसार उभे करून द्या. दु:खी निराश झालेल्यांना सहकार्याचा, मदतीचा हात द्या. त्यांची हिंमत वाढवा.
बरं, बाबा हे केवळ लोकांना सांगून थांबले नाहीत तर त्यांनी जे लोकांना सांगितले त्याप्रमाणे त्यांनी स्वत: आधी तशी कृतीही करून दाखविली. त्यांनी धनिकांच्या पुढे सहकार्याची मदतीची झोळी पसरली, ती समाजातील गोरगरिबांची भूक भागवण्यासाठी. त्यांनी जे धन समाजातील धनिकांकडून दानाच्या स्वरूपात गोळा केले ते करत असताना त्यांनी त्या दात्यांच्या पदरात पुण्य तर घातलेच पण त्याबरोबरच त्यांनी ज्यांना त्या धनाची खरी गरज आहे त्यांना वस्त्र, निवारा, शिक्षण मिळवून दिले. त्यासाठी हातचं काही न राखता मदत केली. आधी केले मग सांगितले म्हणूनच त्या प्रभावी शिकवणीचे पुढे अनेक जण आचरक झाले. या पद्धतीने गाडगेबाबा सुखी समाज घडवण्याचे काम अविरत करीत राहिले. त्यांचेच काम आजही पुढे चालू ठेवून आपण सुखी समाज निर्माण करू शकतो.