मुंबई – आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पदरित्या कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी होतेय. समन्स बजावल्यानंतर आज सकाळी जयंत पाटील हे ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दक्षिण मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
ईडी राजकीय सुडापोटी विरोधी पक्षांच्या नेत्याना अशा नोटिसा जारी करून धमकावण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केला आहे. दरम्यान, आता या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील चौकशीला जाताना सोबत दोन पुस्तक घेऊन गेलेत. कारण वेळ कसा घालवणार?
जयंत पाटलांना सरकारने लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी नोटीस पाठवून गिफ्ट दिलंय, असं त्या म्हणाल्या आहेत. मी लोकसेभेतही बोलले की अनिल देशमुख यांच्या घरी ईडीनं 109 वेळा धाड टाकली. हा खरंतर जागतिक विक्रमच आहे. आता भाजपचेच पदाधिकारी म्हणतायत की मला आता शांत झोप लागते. नवाब मलिक जे टीव्ही वर बोलले ते आता खरं व्हायला लागलं आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.