नवी दिल्ली – गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी, पण ती देशाच्या कायद्यानुसारच असली पाहिजे आणि कोणत्याही राजकीय हेतूने कायद्याच्या राज्याशी खेळणे लोकशाहीसाठी योग्य नाही, असे कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशात अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा जो प्रकार काल घडला त्या पार्श्वभूमीवर प्रियांकांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
कोणाचेही नाव न घेता, प्रियांका गांधी यांनी हिंदीतील ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशाचा कायदा संविधानात लिहिलेला आहे आणि हा कायदा सर्वोपरी आहे. गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी, पण ती देशाच्या कायद्यानुसारच असायला हवी. कोणत्याही राजकीय हेतूसाठी कायद्याच्या आणि न्यायालयीन प्रक्रियेशी खेळणे किंवा त्यांचे उल्लंघन करणे आपल्या लोकशाहीसाठी योग्य नाही, असे प्रियांकांनी नमूद केले आहे.
प्रियांका गांधी यांनी असेही म्हटले आहे की, जो कोणी हे करतो किंवा अशा कृत्यामध्ये गुंतलेल्यांना संरक्षण देतो, त्यालाही जबाबदार धरले पाहिजे आणि त्या व्यक्तीवर कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. देशात न्याय व्यवस्था आणि कायद्याचे राज्य सर्वोच्च असावे, हा आपल्या सर्वांचा प्रयत्न असायला हवा, असेही त्या म्हणाल्या.