नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी एक ट्वीट करून कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या पाच नेत्यांना लक्ष्य केले होते. या नेत्यांच्या नावाचा वापर करून राहुल यांनी अदानी असे नाव तयार केले होते व सत्य लपवतात आणि लोकांची दिशाभूल करतात अशी टिप्पणी त्यात केली होती. त्यांच्या या ट्वीटला आता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले असून त्यांनी राहुल यांना तीन प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे कधीकाळी राहुल यांच्या अत्यंत विश्वासातले असलेले ज्योतिरादित्य आणि राहुल यांच्यातील तणाव विकोपाला जाण्याची शक्यता आहे.
राहुल यांना ट्वीटरद्वारे लक्ष्य करताना ज्योतिरादित्य म्हणाले की माझ्यावर आरोप करून दिशाभूल करणाऱ्या राहुल यांनी तीन प्रश्नांची उत्तरे द्यावीत. पहिला प्रश्न मागासवर्गीय समुदायाबद्दल अवमानकारक भाषा करणारे राहुल माफी का मागत नाहीत? उलट मी माफी मागायला सावरकर नाही असे त्यांचे म्हणणे हा मोठा अहंकार असून एका देशसेवकाचा मोठा अपमान आहे. दुसरा प्रश्न कॉंग्रेस पक्ष सातत्याने न्यायालयाच्या निर्णयांकडे बोट दाखवतो आहे.
मग आता न्यायालयावरच दबाव आणण्याचा (राहुल यांना दोषी ठरवल्याच्या प्रकरणात) प्रयत्न कॉंग्रेसकडून का केला जातो आहे आणि तिसरा प्रश्न राहुल गांधी स्वत:ला प्रथम दर्जाचे नागरिक समजतात का, आणि त्यांच्यासाठी कायदे आणि नियम वेगळे आहेत का? तुम्हाला एवढा अहंकार आहे की कदाचित या प्रश्नांचे महत्वही तुमच्या आकलनापलिकडचे आहे अशा थेट आणि बोचऱ्या शब्दांत ज्योतिरादित्य यांनी टीका केली आहे.