“सत्याभास’ हा गूढकथासंग्रह चंद्रलेखा बेलसरे यांच्या लेखणीतून साकार झाला आहे. कथा जेथे घडते त्या स्थळाचे दृश्य स्वरूप वाचकांच्या डोळ्यांपुढे क्षणात आणणारी चंद्रलेखा बेलसरे यांची शब्दयोजना आहे. “अजनबी पित्याची माया’ या कथेतील सर्म्युचे पठार कोणत्याही छायाचित्राशिवाय आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. ही किमया बेलसरे यांच्या भाषाशैलीची आहे. “राखणदार’ कथेतील नदीच्या लगतचे ते स्मशान, सतीची मंदिरे, तो खोल डोह ही आणखी काही उदाहरणे.
बेलसरे यांची चित्रदर्शी लेखनशैली वाचकांना कथेच्या अंतरंगात खेचून नेणारी आहे. या शैलीमुळे त्यांच्या प्रत्येक कथेतील व्यक्तिरेखा ठसठशीत झाल्या आहेत. “रमजान ईद’ कथेतील नासिर आणि त्याचे कुटुंबीय, “इच्छापूर्ती’ कथेतील मनहर, “बाधित घर’मधील अरविंद, “अजनबी पित्याची माया’ या कथेत प्रत्यक्षात न दिसणारी नॅन्सी, तिचे वडील मायकल डिसोझा अशा व्यक्तिरेखा मनात घर करून राहतात.
बेलसरे यांची वाक्यरचना पल्लेदार आहे. त्यांची लेखणी ज्या सहजतेने कथांमधून अस्सल ग्रामीण जीवन उभे करते तेवढ्याच सहजतेने शहरातील कथानक मांडते. खानदानी घरातील रूबाब त्यांची लेखणी अचूक उभा करते, तीच अचूकता मध्यमवर्गीय घराचे चित्र उभे करताना त्यांच्या कथेत दिसते. त्यांची भारदस्त आणि पल्लेदार भाषा कथेचा प्रवाह पुढे नेताना कथेतील रहस्यावर मात करीत नाही. त्यांच्या गूढ कथांमधील अनेक व्यक्तिरेखा मनाला चटका लावतात. “मातृप्रेम’मधील जयश्री, “ब्रह्मसमंधाशी चार हात’मधला लखूजी, “जन्मखूण’मधील श्रीनिका, “राखणदार’मधील गोविंदा अशा कितीतरी व्यक्तिरेखा बेलसरे यांनी सजीव केल्या आहेत. “जावईशोध’मधील बारक्यावर किंवा “ब्रह्मसंमंधाशी चार हात’मधील पैलवान लखुजीवर मानवी क्रौर्यामुळे आलेली वेळ मनाला हादरवून टाकते. अज्ञाताच्या जगावर अंधाराचा पडदा असला तरी बेलसरे यांच्या, त्या जगाशी निगडित कथा मात्र प्रकाशाचाच संदेश देतात. “वाईटावर चांगल्याचा विजय’ हेच जगाच्या अस्तित्वाचे सूत्र आहे. ते सूत्र बेलसरे यांच्या कथांमधून अधोरेखित होते.
या कथा सत्य, न्याय आणि मांगल्य याचाच आग्रह धरणाऱ्या आहेत. तो आग्रह धरताना कुठेही त्यांच्या कथा संदेशपर होत नाहीत. विस्मय, रंजन आणि अद्भुत याचा अनुभव देणाऱ्या त्या कथा आहेत. कथेची सुरुवात आणि शेवट या दरम्यान त्यांनी उभारलेली गूढतेची सृष्टी वाचकांना साद घालत राहील, यात शंका नको. या कथांमध्ये रहस्याचा ताण जरूर आहे, तेवढाच सुखद दिलासा सुद्धा आहे. वाचकांचे कुतूहल वाढवित राहते.
चपराक प्रकाशन,
पृष्ठे – 168, मूल्य- 300 रुपये