आयपीएल स्पर्धा सोळाव्या वर्षात पदार्पण करत आहे. यंदाच्या स्पर्धेचे स्वरूप आजवरच्या स्पर्धेपेक्षा खूपच वेगळे आहे. यात बीसीसीआय व आयपीएल समितीने काही नवे नियम समाविष्ट केले आहेत. हे नियम प्रत्यक्ष जेव्हा योग्य की अयोग्य, यापेक्षा वेळखाऊ किती आहेत ते समोर येईल तेव्हाच त्यांची उपयुक्तताही कळेल. पाहूया काय आहेत नवे नियम.
इम्पॅक्ट प्लेअर
प्रत्येक संघ त्यांच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये एक खेळाडू बदलू शकतो. मात्र, जर बदलला गेलेला खेळाडू परदेशी असेल तर त्यांना संघातील एक परदेशी खेळाडू वगळावा लागेल. कारण एकावेळी चारच परदेशी खेळाडू खेळवता येतात. तसेच प्रत्येक डावात 14 वे षटक सुरू होण्यापूर्वी इम्पॅक्ट प्लेयरला संघात घेता येणार आहे. यासाठी पंच आपले हात वरच्या दिशेने क्रॉस करत नवा इशारा देतील. नाणेफेकीच्या वेळी प्रत्येक संघाला चार इम्पॅक्ट प्लेयरची नावे देणे बंधनकारक असून, हे चारही खेळाडू एकाच वेळी खेळू शकतील.
नाणेफेकीनंतर संघाची घोषणा
या नियमांतर्गत प्रत्येक कर्णधाराला नाणेफेक झाल्यावर अंतिम संघ जाहीर करण्याची मुभा मिळणार आहे. तसेच प्रत्येक संघाचा कर्णधार दोन वेगळ्या संघांसह नाणेफेकीला येऊ शकतो व नाणेफेकीनंतर अंतिम संघ जाहीर करू शकतो.
वाइड व नो-बॉलसाठी डीआरएस
यंदाच्या स्पर्धेपासून केवळ बाद निर्णयाविरुद्ध दाद मागण्यासाठी डीआरएस घेता येत होता. आता वाइड व नो-बॉल चेंडूसाठीही ही सुविधा वापरता येणार आहे. पुरुषांच्या आयपीएलपूर्वी झालेल्या महिलांच्या आयपीएल स्पर्धेपासून बीसीसीआयने हा नियम आणला आहे. त्यामुळे एखादा खेळाडू वाइड तसेच नो-बॉलसाठी पंचांच्या निर्णयाशी असहमत असल्यास फलंदाजी किंवा गोलंदाजी करत असलेल्या संघाला डीआरएस घेता येणार आहे.
स्लो ओव्हर रेटसाठी जागेवरच दंड
आयपीएल स्पर्धेचा इतिहास पाहिला तर प्रत्येक सामन्यात वेळेत षटके पूर्ण होताना दिसत नाहीत. परिणामी सामन्याचा कालावधी वाढतो. अशा वेळी सामना संपल्यावर सामनाधिकारी दंड करतात. यंदापासून असे होणार नाही. जर वेळेत षटके पूर्ण झाली नाहीत तर सामना सुरू असतानाच दंड केला जाणार आहे. वेळ संपली व जितकी षटके बाकी राहिली असतील ती पूर्ण केली जातील, पण त्यावेळी सीमारेषेवर केवळ चारच क्षेत्ररक्षक उभे करता येतील. मात्र, पॉवरप्ले संपल्यावर हे घडले तर त्या स्थितीत पाच क्षेत्ररक्षक सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करू शकतील. ही झाली नियमांची ओळख आता याची रचना व प्रत्यक्ष उपयुक्तता प्रत्येक सामन्यातूनच दिसून येणार आहे. बीसीसीआयदेखील यावर मंथन करत असून, यातील जे नियम वेळखाऊ ठरतील ते कदाचीत बदलले जातील किंवा पुढील स्पर्धेपासून रद्द होतील.
…तर चेंडू ठरणार डेड बॉल
गोलंदाजाने स्टार्ट घेतल्यावर चेंडू खेळपट्टीवर पडेपर्यंतच्या कालावधीत कोणत्याही खेळाडूने हालचाल केली तर हा चेंडू डेड बॉल जाहीर केला जाणार आहे. हा नियम नॉन स्ट्रायकर फलंदाजाने एन्ड बदलला तरी लागू पडणार आहे. क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी उभे केले जातील तेथून ते चेंडू पडत असेपर्यंत पुढे येऊ शकतात. मात्र, मागे किंवा इतरत्र जाऊ शकत नाहीत. असे घडले व पंचांनी डेड बॉल घोषित केला तर ही कृती करणाऱ्या संघाला पाच धावांचा दंडही केला जाणार आहे.