नवी दिल्ली : देशभरात सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. देशभरात निदर्शने करण्यात येत असून सरकारच्या विरोधात काळे कपडे घालून आंदोलन करण्यात येत आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेसने केवळ पंतप्रधानांचा अपमान केला नाही तर राष्ट्रपतींचाही अपमान केला असल्याचा आरोप इराणी यांनी केला आहे.
स्मृती इराणींनी राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेल्या विधानावर बोलताना, गांधी परिवाराने दलित किंवा मागासवर्गीय लोकांचा अपमान करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे म्हटले. त्यासोबतच आदिवासी समाजातील एक महिला राष्ट्रपती झाल्यावर गांधी कुटुंबाच्या सूचनेवरून काँग्रेस सदस्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही अपमान केला, असल्याचा आरोप यावेळी केला.
एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींची प्रतिमा नष्ट करेपर्यंत त्यांच्यावर हल्ला करतच राहू, असा आरोप केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे. गांधी घराण्यानेही पंतप्रधानांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. पंतप्रधान मोदींवरील सर्वसामान्यांचे प्रेम त्यांना कमी करता आले नाही. असे म्हणत राहुल गांधी यांच्यवर पलटवार केला.
राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवताना स्मृती इराणी म्हणाल्या की, ‘राहुल गांधींची मानसिक दिवाळखोरी समोर आली आहे. लंडनमध्ये, भारतात, संसदेत आणि संसदेबाहेर ते सतत खोटे बोलत आहेत. राहुल गांधींचे लक्ष्य पंतप्रधान मोदी असून पंतप्रधान मोदींचे लक्ष देशाच्या विकासावर आहे.असेही त्या यावेळी म्हणाल्या.