मुंबई – राज्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सुमारे सतरा लाखांहून अधिक कर्मचारी संपावर गेले होते. याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसू लागला होता. मात्र अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कर्मचारी मंडळाची एक बैठक पार पडली यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. याचे पडसाद देखील संपूर्ण राज्यभर उमटायला लागले होते. जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी एका समितीमार्फत अभ्यास केला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली
उद्यापासून सर्व शाळा, रुग्णालये, सरकारी कार्यालयांतील कर्मचारी आपापल्या कर्तव्यावर रुजू होतील, अशी माहिती काटकर यांनी दिली.सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेंशन योजना लागू करण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण होऊन सर्वसामान्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागत होता.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील केली होती मागणी
देशात हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड अशा काही राज्यांनी ही जुनी पेंशन योजना लागू केली आहे अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने ताबडतोब निर्णय घेऊन आंदोलनकर्त्यांना समाधानी करावे अशी आमची मागणी आहे, असे विरोधीपक्षनेते अजित पवार हे देखील माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.