औरंगाबाद : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धारशिव असे नामांतर करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर राज्यात संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. केंद्राच्या मान्यतेनंतर राज्य सरकारने शहरांनी नावे बदलण्याची अधिसूचना जारी केल्यापासून ही दोन्ही शहरे नव्या नावाने ओळखली जाणार आहेत. मात्र, या नामांतराला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. तसेच त्यांनी नामांतर करून शहराचा विकास होणार आहे का असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
एमआयएमच्या राष्ट्रीय मेळाव्यात बोलताना इम्तियाज जलील यांनी या नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी, “इम्तियाज जलील हे औरंगाबादचे खासदार होते आणि औरंगाबादचेच खासदार राहतील. काहीजण औरंगाबादचे नामांतर केल्यानंतर उड्या मारत आहेत. पण, माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला आणि मी औरंगाबादमध्येच मरणार,” असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.
तर, एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही नामांतरला विरोध कायम राहणार असल्याचं सांगितलं. “स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात न घेताच परस्पर हे नामांतर करण्यात आलं आहे. नाव बदलून औरंगाबादचा विकास होणार आहे का? किंवा शहरातील नागरिकांना दोन वेळ पुरेसे पाणी मिळणार आहे का,” असा सवालही ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.