रांची – झारखंडमधील कॉंग्रेसच्या चार नेत्यांना पक्ष शिस्तीचा भंग केल्याच्या आरोपावरून सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी पक्षाच्या राज्यातील नेतृत्वाच्या विरोधात केलेल्या कारवायांमुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस शिस्तपालन समितीने केली होती.
आलोक दुबे, लाल किशोर नाथ शाहदेव, डॉ. राजेश गुप्ता आणि साधू शरण गोपे अशी निलंबित करण्यात आलेल्या चार नेत्यांची नावे आहेत. आलोक दुबे हे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आहेत.
शिस्तपालन समितीचे अध्यक्ष ब्रिजेंद्र प्रसाद सिंह यांनी सांगितले की, यापूर्वी पक्षाची प्रतिमा डागाळल्याबद्दल आणि प्रदेशाध्यक्षांविरोधात विधाने केल्याबद्दल पक्षाच्या सात नेत्यांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले होते.
सात नेत्यांपैकी तीन नेत्यांनी स्पष्टीकरण दिले, त्यात सरचिटणीस अनिल ओझा, राकेश तिवारी यांचे स्पष्टीकरण वाचून आम्ही समाधानी आहोत, तर साधू शरण गोपे यांचे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती.