चेन्नई – राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांच्या मतांकडे त्याचवेळी लक्ष दिले असते तर देशाची फाळणी टाळता आली असती. इंग्रजांनी देशाचे विभाजन करण्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आंबेडकर पहाडासारखे उभे राहिले. त्यांनी परवानगी दिली नव्हती, असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी केले आहे.
मोदी@20 (ड्रीम्स मीट डिलिव्हरी) या पुस्तकाच्या तामिळ आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात रवी बोलत होते. राज्यपाल रवी म्हणाले, आपण पंतप्रधान मोदींचे आभार मानले पाहिजे. कारण त्यांच्यामुळे सर्वांनी डॉ. आंबेडकरांचा विचार करायला सुरुवात केली आहे. जेव्हा मुस्लीम नेत्यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली तेव्हा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटले की ते व्यवस्थापित केले जाऊ शकते.
आंबेडकरांचे म्हणणे ऐकले असते तर फाळणी टाळता आली असती, एवढी वेदना झाली नसती. पूर्वी लोक फक्त राजकारणासाठी डॉ. आंबेडकरांचे नाव वापरत होते. आज मात्र सामाजिक न्यायाच्या नावाने नकाश्रू ढाळले जाताना दिसतात.
रवी पुढे म्हणाले की, तामिळनाडू राज्यात दलितांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. दलितांवरील कथित गुन्हे रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून फौजदारी न्यायव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. आपण सामाजिक न्यायाबद्दल नुसतेच बोलतो; परंतु प्रत्येक दिवशी आपण दलितांवरील अत्याचाराच्या बातम्या ऐकत रहावे लागते, अशा शब्दांत राज्यपाल आर. एन रवी यांनी स्टॅलिन सरकारवर जोरदार हल्ला चढवला.