पुणे – पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोट निवडणुकांचे वारे सुरू झाले आहे. पोटनिवडणुकीवरून भाजप विरोधात महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झालेल्या असताना मनसेचे नेते वसंत मोरे यांची एक सोशल मीडियायावरील पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मोरे यांनी आपल्या पोस्टमधून शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात अनेक महापालिकांवर प्रशासक राज आहे. महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल केव्हा वाजणार याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. मात्र चिंचवड विधानसभा आणि कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यावरूनच वसंत मोरे यांनी थेट शिंदे फडणवीस सरकारला जाब विचारला आहे.
आपल्या पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणतात, “माझा शिंदे-फडणवीस सरकारला एक प्रश्न आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे २ आमदार नुकतेच मयत झाले.आजुन त्यांच्या सरणाची राख निवली सुद्धा नसेल,तर तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या. मग मागील एक वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे. विकास कामे ठप्प झाली आहेत निधी नसल्यामळे नागरिकांना थोबाड दाखवू वाटत नाही.पुण्यातील आमदार खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पहावे आणि हो जर कोणत्या पक्षाला सहनुभुती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असताल तर तुमचा पराभव निश्चित समजा कारण जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार” अशा आशयाची पोस्ट मोरे यांनी केली आहे.