लोकसभेबरोबर विधान सभेची निवडणूक घ्या
भुवनेश्वर, दि. 9 – ज्या राज्यांत विधान सभेची मुदत संपली आहे व निवडणुका व्हावयास हव्यात त्या राज्यांत लोकसभेच्या निवडणुकीबरोबर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी जनता पार्टीचे अध्यक्ष मोरारजी देसाई यांनी केली. निवडणुकीचा खर्च यामुळे कमी होईल, असे ते म्हणाले.
कम्युनिस्ट पक्षाशी आमचा करार नसला तरी जनता पार्टी तिरंगी लढती टाळण्याचा प्रयत्न करील. जनतंत्र कॉंग्रेस जनता पक्षाचा घटक पक्ष नाही, असाही खुलासा त्यांनी केला. देसाई यांनी आपला पक्ष विजयी होईल असा विश्वास व्यक्त करत कॉंग्रेसला बहुमत मिळणार नाही, असे म्हटले.
भारतीय-जनता हीच कॉंग्रेसची शक्ती
नवी दिल्ली – भारतीय जनता ही आमची शक्ती आहे व कॉंग्रेसचा विजय हा जनतेचा विजय आहे, असे पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या. जे पक्ष एकमेकांविरुद्ध उघड आरोप करीत होते ते आता मित्र झाले. जनता सत्य जाणील. मागेही सत्य जनतेला उमगले होते. गुलामगिरी की लोकशाही ही घोषणा घेऊन हे पक्ष पुढे आले होते; पण परकीय सत्ता असताना यापैकी कुणीही गुलामगिरीविषयी चिंता केली नव्हती.
राजकीय पक्षास देणगी देण्यास बंदी
नवी दिल्ली – राजकीय पक्षांना देणगी देण्यास कंपन्यांना अजूनही बंदी आहे, असा खुलासा अधिकृतपणे करण्यात आला.