पुणे – कसबा विधानसभा निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमचीही इच्छा आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने सर्व राजकीय पक्षांना एक विनंती पत्र पाठविण्यात येणार असल्याची माहिती भाजपनेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यासाठी कसबा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आलेल्या राजकीय समितीच्या प्रमुख माधुरी मिसाळ सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाही करणार असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. ही निवडणूक बिनविरोध करायची का नाही, हे विरोधीपक्षांनी ठरवायचे आहे. मात्र, आम्ही गाफील राहणार नाही असेही ते म्हणाले.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्याची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, अद्याप उमेदवार ठरलेला नाही. जे जे उमेदवार या निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. त्याची यादी प्रदेश कार्यकारिणीला कळविण्यात आली आहेत. त्यातील तीन नावे दिल्लीला केंद्रीय समितीला कळविली जातील.
त्यातील एक नाव अंतिम करून एक किंवा दोन फेब्रुवारीला ते जाहीर केले जाईल. मात्र, तोपर्यंत पक्षाकडून मतदारसंघात आपले काम सुरू करण्यात आले आहे. त्या अंतर्गत 10 फेब्रुवारीपर्यंत मतदारसंघातील 1 लाख घरांमध्ये उमेदवाराचे नाव टाकता पक्षाचे पत्रक पोहचवले जाईल. तसेच पक्ष घराघरात पोहचविला जाईल. विरोधीपक्ष घरातील उमेदवार दिल्यास निवडणूक बिनविरोध केली जाईल, असे सांगत असतील तर त्यांनी नेमके कोणते नाव हवे हे स्पष्ट करावे. त्यावर भाजप नक्कीच विचार करेल असेही ते म्हणाले.
भाजपने पाच नावे पाठविल्याची चर्चा
दिल्लीला केवळ तीन नावे पाठविण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून सांगण्यात येत आहे. तरी प्रत्यक्षात मात्र भाजपने पाच नावे पाठविल्याची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात होती. त्यात मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक, पती शैलेश टिळक, माजी सभागृह नेते धीरज घाटे, गणेश बिडकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने या नावाचा समावेश असल्याची चर्चा होती.