नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक
नगर – शहराच्या जनतेने 2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या चिन्हावर उमेदवार असणाऱ्या सत्यजित तांबेंना भरघोस मतदान केले. पण ते कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून गेलेच पण 29 हजार मतदारांना देखील त्यांनी वाऱ्यावर सोडले. नगरकरांकडे त्यांनी परत कधी पाहिले नाही. कॉंग्रेसने विश्वासाने दिलेला एबी फॉर्म यांनी गद्दारी करत खिशात घातला. त्यांनी आधी कॉंग्रेसला मामा बनवलं. आता मतांसाठी ते सुशिक्षित असणाऱ्या पदवीधरांना मामा बनवत असल्याची जोरदार टीका शहर कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली. शहरामध्ये पदवीधर मतदारांच्या आयोजित संवाद कार्यक्रमामध्ये काळेंनी कॉंग्रेसच्यावतीने तांबेंच्या गद्दारीवर टीका करत हल्लाबोल केला.
यावेळी ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते, नगर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष अक्षय कुलट, मच्छिंद्र साळुंखे, अशोक शिंदे, स्वप्निल पाठक उपस्थित होते. काळे म्हणाले की, यांना पक्षाने कोरा एबी फॉर्म दिला होता. डॉ.तांबे यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली होती. त्यांना लढायचे नव्हते तर ते सत्यजित यांचा उमेदवारी अर्ज कॉंग्रेसकडून दाखल करू शकत होते. मात्र यांनी गद्दारी केली. राज्यात सध्या गद्दारांचे सरकार आहे. त्यांना भाजपमध्ये जायचे आहे. भाजपच्या पाठिंब्याने निवडणूक लढणार असे म्हणत यांनी प्रचाराला सुरूवात केली. त्यांच्या श्वासात, रक्तात फक्त सत्ता आहे. यांना पदवीधरांच्या प्रश्नांचे काही देणेघेणे नाही, अशी टीका काळे यांनी केली. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या सर्वसामान्य घरातल्या आहेत. त्यांना घराणेशाहीचा वारसा नाही. त्यांचा विजय निश्चित असून, नगर शहरासह जिल्ह्यातील कॉंग्रेस त्यांच्या प्रचारासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे काळे म्हणाले.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 30 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडूनही जोरदार प्रचार सुरू आहे. यंदा विविध राजकीय घडामोडींमुळे नाशिक पदवीधर मतदारसंघ राज्यभरात चर्चेत आहे. या मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सत्यजित तांबे यांनी निवडणुकीत अपक्ष अर्ज भरला आहे. त्यांना कॉंग्रेस पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.