नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक
संगमनेर – सत्यजित यांच्यात बोलण्याचे उत्तम कौशल्य असल्याने त्यांनी कधीच वादग्रस्त वक्तव्य केले नाही. तरुण नेतृत्वाला संधी देण्यासाठी आपण घेतलेला थांबण्याचा निर्णय बहुतेकांना भावला असून, हा निर्णय सत्यजित तांबे यांना विक्रमी मतांनी विजयी करणारा ठरेल, असा विश्वास आ. डॉ. सुधीर तांबे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. नाशिक पदवीधर निवडणूक जनतेनेच हातात घेतली असून, जिल्ह्यातून वेगवेगळ्या संघटना सत्यजित यांना पाठिंबा देत असल्याने डॉ. तांबे म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीत राजकीय परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार नाही. मात्र, असे असतानाही आपण कोणत्याही राजकीय पक्षाकडून पाठिंबा मागितलेला नाही.
देशात पेट्रोल अथवा पेट्रोलियम पदार्थ व मोठ्या उद्योगांची कमतरता आहे. त्यामुळे आपल्याला उच्चस्थानी जायचे असेल, तर शिक्षण हाच राजमार्ग असल्याचे ते म्हणाले. आपला देश युवकांचा आहे. त्यांच्यासाठी आपण जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. मागील 13 वर्षांत आपण खूप लोकांशी संपर्क केला. त्यात डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार यांच्याशी सातत्याने संपर्क साधून आपण त्यांचे प्रश्न समजावून घेण्याचा व सभागृहाच्या माध्यमातून ते सोडविण्याचा सतत प्रयत्न केला. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांतील सर्वपक्षियांशी आपले वेगळे नाते निर्माण झाले असून, लोकांच्या मनात पक्षीय राजकारणापलीकडे नेणारी वेगळी आस्था तयार झाल्याचे डॉ. तांबे म्हणाले.
सत्यजितला वारसा दिला नाही
नाशिक पदवीधर निवडणूक लोकांनीच हातात घेतली आहे. लोकांना मी घेतलेला निर्णय खूप आवडला आहे. राजकारणात काम करताना मी सत्यजितला संधी दिल्याने अनेकांचे चांगले मत आहे. काहींना वाईट वाटले असेल; पण त्यांनासुद्धा निर्णय आवडला असून, माझा मुलगा म्हणून मी सत्यजितला वारसा दिला नाही. सत्यजितमध्ये राजकारणात काम करण्याची तीव्र इच्छा आणि सामाजिक प्रश्न जाणून घेण्याची आकलनशक्ती असून, समाजाला अशा तरुण नेतृत्वाची गरज असल्याचे मत डॉ. सुधीर तांबे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.