मुंबई – महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमा वाद हा मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. महाराष्ट्र कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेशावर आपला हक्क सांगतो, तर दुरसरीकडे कर्नाटक महाराष्ट्रात असलेल्या कन्नड भाषिक प्रदेशावर आपला दावा सांगत आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा या सीमा वादाला तोंड फोडले आहे. तसेच, या वादात केंद्र सरकारही वेळोवेळी आपली भूमिका बजावत आहे.
दरम्यान, असं असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कानडी भाषेतूनच आपल्या भाषणाची सुरुवात केल्याचं दिसून आलं आहे. नुकतंच फडणवीस यांनी कर्नाटकातील चिक्कमंगलुरू येथील सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कानडी मधून केली.
त्यामुळं कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांच्या भाषणाला भरभरून दाद देत टाळ्या वाजवत फडणवीसांचं स्वागत केलं. मात्र, त्यानंतर आता त्यांच्या या भाषणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीये. नेटकरी देखील त्यांच्या या भाषणावर टीका करताना दिसून येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील या सीमा वादाची न्यायालयीन लढाई 2004 पासून सुरु आहे. मात्र, अत्यंत धीम्या गतीने चालणारी ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. या न्यायालयीन लढाईचा निकाल हा महाराष्ट्राच्या बाजूने लागेल, अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केलेली आहे.