– संदीप बोडके
थेऊर, -हवेली तालुक्याच्या पूर्व भाग हा लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन, वाघोली, केसनंद, मांजरी व फुरसुंगी या शहर व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मध्यवर्ती आहे. शेकडो वर्षांपासून येथील आठवडा बाजाराला परंपरा आहे. यामध्ये ग्रामीण भागातील अनेक गावांतील नागरिक भाजीपाला विक्री, खरेदीच्या निमित्ताने येत असतात. त्यामुळे आठवडा बाजार चांगला भरत असे; मात्र दोन वर्षांपूर्वी करोनामुळे आठवडा बाजारपेठ बंद केली होती.
यामुळे भाजीपाला विक्रेत्यांची संख्या वाढली असून करोना काळात काही व्यापारी व शेतकरी भाजीपाला घेऊन घरोघरी येत. तीच सवय आता ग्राहकांसह व्यापारी, शेतकऱ्यांना लागली आहे. त्यामुळे आठवडा बाजारातील वर्दळ कमी झाली असून घराघरासमोर दैनंदिन भाजीपाला विक्रीसाठी येत असल्याने आठवडा बाजारात उलाढाल कमी होत आहे. तर काही गावांमध्ये रोजच भाजीपाला विक्रेत्यांनी मुख्य चौकात विक्रीची दुकाने थाटली आहेत.
रविवारी उरुळी कांचन, मंगळवारी कुंजीरवाडी, बुधवारी थेऊर, शनिवारी लोणी काळभोर असा येथील आठवडा बाजार भरत असतो. या गावात आसपासच्या गावातील नागरिक जोडले गेले आहेत. आठवडा बाजार वगळता शहरासह उपनगरात डझनभर ठिकाणी बाजार भरत आहे. हवेलीकरांच्या निवासस्थानाच्या परिसरातच बाजार उपलब्ध झाल्याने शहरातील आठवडा बाजारही मोजक्याच ग्राहकांभोवती फिरायला लागला आहे.
शहराला लागूनच ग्रामीण भाग असल्याने शेतकरी उत्पादित भाजीपाला शहरात आठवड्यातून एकदा भरणाऱ्या बाजारात त्याची विक्री करत होते. कालांतराने शहराबाहेर ग्रामीण भागातील मार्केटमध्ये भाजीपाल्याचे सौदे सुरू झाले आहेत. शेवाळेवाडी येथील उपबाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होत असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी या बाजाराला पसंती दिली आहे. त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांकडून या ठिकाणी भाजीपाल्याची खरेदी करून दुसऱ्या शहरात पाठवू लागले आहेत.
त्यामुळे हवेली, पुरंदर, दौंड व इंदापूर येथील ग्रामीण भागातील भाजीपाला शेवाळेवाडी येथे येऊ लागला आहे. पर्यायाने तालुक्याचा ग्रामीण भाग भाजीपाला मार्केट बनत आहे. हातावर पोट असणारा ग्राहक आठवडा बाजारात दिसतो. शहरानजीकच्या असलेल्या गाववस्तीवरची ग्रामीण जनताही या बाजारात सहभागी होते. भाजीपाला व्यतिरिक्त इतर साहित्य आणण्यासाठीच आठवडा बाजारात नागरिक येत आहेत.
आठवडे बाजार सातत्याने विस्तारित होत आहेत; मात्र या बाजाराचा ताजेपणा आजही कायम आहे. घरासमोर व परिसरात ताजा भाजीपाला उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आठवडा बाजारापासून आता ग्राहक दूर गेला आहे.
-लक्ष्मण चव्हाण, नागरिक
करोनापूर्वी आठवडा बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय होती. तेव्हा बाजार बंद असल्याने घरोघरी भाजीपाला विक्री सुरू झाली. अजूनही ही पद्धत सुरूच असल्याने ग्राहकांची संख्या घटली आहे.
– मयूर काळभोर, भाजीपाला विक्रेते