मुंबई : सध्या महाराष्ट्रात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याच मुद्द्यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर आणि सुषमा अंधारेंमुळे उद्धव ठाकरेंची प्रचंड ताकद वाढणार आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा, अशी उपरोधिक टीका रामदास कदम यांनी केली. उद्धव ठाकरे यांना सध्या सुषमा अंधारे यांच्या पदराचा सहारा घ्यावा लागतो. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता कुणीच राहिलं नाही, त्यामुळे जो येईल त्याला पक्षात घ्यायचं, हा एककलमी कार्यक्रम उद्धव ठाकरे यांनी सुरू केलाय, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत भाष्य करताना रामदास कदम यांनी, “प्रकाश आंबेडकर आणि सुषमा अंधारे यांच्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद प्रचंड वाढणार आहे. यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना कुठे आहे? हे लोकं शोधत बसतील. आता खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांचं पितळ उघडं पडतंय, हे चांगलं आहे. त्यांना खूप शुभेच्छा, अशी उपरोधिक टीका कदम यांनी केली.
तसेच पुढे बोलताना ,“काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्याशी ते युती करू पाहत आहेत. आता आणखी कुणी मिळतंय का? हे उद्धव ठाकरेंनी दिवा लावून शोधावं. जी अंधारेबाई हिंदू देवतांवर प्रचंड टीका करते. तिच्या पदराचा सहारा उद्धव ठाकरेंना घ्यावा लागतोय. वरती बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला काय वाटत असेल? याची पर्वा आणि जाणीवही त्यांना नाही. त्यांच्यासोबत आता कुणीही राहिलं नाही. त्यामुळे जो येईल त्याला सोबत घ्यायचं एवढाच त्यांचा एककलमी कार्यक्रम चालला आहे,” असेही रामदास कदम म्हणाले.