बुलढाणा – वृद्ध दाम्पत्याने सोबतच मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. बँकेचे कर्ज, नापिकी आणि आजारपणाला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याची माहिती नातेवाईक आणि ग्रामस्थांनी दिली आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील बेलुरा गावात घडली आहे. वसंत डामरे (वय 70) आणि सरलाबाई डामरे (वय 65) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कर्जबाजारीपणा आणि सततची नापिकी, अतिवृष्टी अशा विविध संकटांमुळे शेतकरी आपली जीवनयात्रा संपवत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. महाराष्ट्रात नऊ महिन्यांत म्हणजेच जानेवारी 2022 ते सप्टेंबर 2022 मध्ये 2 हजार 138 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या या विदर्भात झाल्या आहेत. तसेच मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील आत्महत्यांचा आकडा वाढत आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सप्टेंबरनंतर देखील राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यात आतापर्यंत कोणत्याही सरकारला यश आलेले दिसत नाही.