भोपाळ – कुठल्याही स्थितीत भारताचे रक्षण करण्यासाठी संरक्षण दले पुरेशी मजबूत आणि सक्षम आहेत. मात्र, कॉंग्रेस नेते राहुल गांधी बहुधा अजूनही 1962 च्या काळात जगत आहेत, असा पलटवार केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी केला.
चीन आणि पाकिस्तान संयुक्तपणे भारतावर हल्ला करू शकतात, असा इशारा राहुल यांनी रविवारी माजी सैनिकांशी साधलेल्या संवादावेळी दिला. त्यावर ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली.
भारत आणि चीनमध्ये 1962 या वर्षी युद्ध झाले होते. त्यामध्ये भारताची काहीशी पीछेहाट झाली. त्याचा संदर्भ ठाकूर यांनी दिला. राहुल यांनी वारंवार भारतीय लष्कराचा अपमान करू नये. लष्कराचे मनोबल कमी करण्याचा विडा कॉंग्रेसने उचलला आहे का? भारतीय लष्करावर राहुल यांचा विश्वास नाही का, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.
दहशतवादावर प्रभावी वार म्हणून भारतीय जवानांनी यशस्वी सर्जिकल स्ट्राईक केले. त्याशिवाय, चीनी कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.