नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळात कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावरून चांगलीच खडाजंगी झाली. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ज्या आक्रमकतेने कर्नाटकची भूमिका मांडतात त्या आक्रमकतेने आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राची बाजू का मांडत नाहीत असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.
आजचे अधिवेशन सुरु होण्यापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. काल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं निलंबन केल्याच्या मुद्द्यावरून देखील आज अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्याप्रमाणे एक इंचही जमीन महाराष्ट्राला न देण्याचा ठराव करतात त्याप्रमाणे महाराष्ट्र देखील कर्नाटकातील मराठी माणसांच्या पाठीशी उभा असल्याचा ठराव देण्यात आला आहे परंतु आपला ठराव अजून का आला नाही असा जाब यावेळी अजित पवार यांनी विचारला.
बोम्मई यांच्याप्रमाणे आक्रमक होऊन शिंदे फडणवीस देखील बाजू का मांडत नाहीत याच उत्तर त्यांनी द्यावं असंही पवार यावेळी म्हणाले. तसेच जयंत पाटील यांच्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले,सरकार निर्लज्जासारखं वागतं. सरकारला मनाची नाही तर जनाची तरी आहे का ? असं अनेकदा सभागृहात बोललं जात. पण हे लोक सोयीचं राजकारण करत आहेत असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यावेळी व्यक्त केलं.