मुंबई : आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे मतदान सुरू झाले आहे. तर दुसरीकडे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील वडवणी तालुक्याचे तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
बीड जिल्ह्यातही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात निवडणूक कामकाजासाठी शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसह इतर विभागातील सहा कर्मचाऱ्यांवर मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून दिलेली जबाबदारी पार पाडण्यात हलगर्जीपणा केला असल्याचे समोर आले.
ही बाब निदर्शनास येताच वडवणीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. रविंद्र धर्मराज गायकवाड, महारुद्र ललितराव बादाडे, शाहूराव पांडुरंग जायभाये, दिलीप देवजी माऊची, सुवर्ण सखाराम आयचित, व्ही. एस. डाके या सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
बीड तालुक्यातील चऱ्हाटा ग्रामपंचायत अंतर्गत मेंगडे वस्ती येथील मतदान बूथ प्रत्येक वेळी मेंगडेवाडीच येथेच असते. मात्र यावेळी प्रशासनाने अचानक तेथील बूथ चऱ्हाटा येथे हलविल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. रात्री उशिरा ग्रामस्थांनी बीड तहसिलसमोर ठाण मांडले होते. मेंगडेवाडी येथेच बूथ ठेवा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.