मुंबई – भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी कंपनीने दरवाढ जाहीर केल्या असतानाच टाटा मोटर्स कंपनी पुढील महिन्यापासून आपल्या विविध वाहनाच्या दरात वाढ करण्याच्या शक्यतेवर विचार करीत आहे.
एकूणच महागाई वाढल्यामुळे वाहनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली आहे. त्याचबरोबर एक एप्रिल पासून उत्सर्जनाचे नवे नियम भारतात लागू होणार आहेत. ही यंत्रणा विकसित करण्यासाठी वाहन कंपन्यांना गुंतवणूक करावी लागणार आहे.
या दोन कारणामुळे वाहनांच्या दरात वाढ करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे टाटा मोटर्सचे प्रवाशी वाहन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी सांगितले. गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीच्या किमती वाढल्या आहेत. मात्र आम्ही अजूनही वाहनांच्या दरात वाढ केलेले नाही.
याच कारणामुळे भारतात कार्यरत असलेल्या इतर वाहन कंपन्या लवकरच आपल्या विविध वाहनांच्या दरात वाढ करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही महिन्यापासून भारतामध्ये व्याजदर वाढूनही वाहनांच्या विक्रीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आता वाहनांच्या दरातही वाढ होणार असल्यामुळे याचा ग्राहकांच्या मानसिकतेवर किती परिणाम होतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.