हुबळी – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज सीमाभागातील जनतेच्या जखमेवर पुन्हा एकदा मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्यासाठी सीमाप्रश्न संपला असून महाराष्ट्र वाद उकरून काढत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा थेट इशारा त्यांनी दिला.
हुबळी येथील एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर भाष्य केले. कर्नाटकच्यादृष्टीने सीमाप्रश्न हा संपलेला अध्याय आहे. पण महाराष्ट्र हे पुन्हा उकरून काढू पाहात आहे. सीमाप्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोकांमध्ये सामंजस्य आहे, त्याच वेळी सीमावाद देखील आहे. कर्नाटकच्या मते सीमावाद हा एक बंद अध्याय आहे; परंतु महाराष्ट्राने वारंवार हा मुद्दा उपस्थित केल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर असताना, अशी कृत्ये आणि भेटी प्रक्षोभक असतात आणि लोकांना भडकावतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी येऊ नये, यासंदर्भात महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना सध्या येऊ नये, असा स्पष्ट लिखित संदेश पाठवला आहे. सध्या वातावरण बरोबर नाही. त्यामुळे ते जर कर्नाटकात आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. अशा परिस्थितीत आम्ही कर्नाटकात येणार म्हणणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले.