बेंगळुरू – भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी मतदारसंघनिहाय निकालांचे तपशीलवार विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मावळते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज सांगितले. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव असल्याचा राजकीय निरीक्षक आणि कॉंग्रेस पक्षाकडून सातत्याने केला जात आहे. पण हा दावा फेटाळून लावत ते म्हणाले की,
पक्षाच्या कामगिरीमध्ये अनेक घटक कारणीभूत आहेत आणि त्या सर्वांचे विश्लेषण केले जाईल. या संदर्भात लवकरच सर्व नवनिर्वाचित सदस्य व उमेदवारांची बैठक घेण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्या नेतृत्वाखाली बोम्मई यांच्यासह काही भाजप नेत्यांनी रविवारी पक्षाच्या मुख्यालयात बैठक घेऊन चर्चा केली.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बोम्मई म्हणाले की, आम्ही निकालांबाबत अनौपचारिक चर्चा केली आहे आणि विविध क्षेत्रांमधून माहिती मिळवली आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही एकूण निकालांचे तपशीलवार विश्लेषण आणि मतदारसंघनिहाय विश्लेषण करण्याच्या निर्णयावर आलो आहोत. ते म्हणाले की, भाजपची मतांची टक्केवारी तेवढीच राहिली असली तरी जागा कमी झाल्या आहेत.
मतदारसंघनिहाय मतांचे विश्लेषण इतरांबरोबरच विभागनिहाय अँटी-इन्कम्बन्सी सारखी त्याची कारणे देऊ शकतात. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांचीही लवकरच एक बैठक बोलावण्यात येणार आहे भाजप केवळ निवडणुकीपुरते काम करत नाही, असे सांगून बोम्मई म्हणाले की, पक्ष संघटित करणे ही निरंतर प्रक्रिया आहे.
आम्ही आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करणार आहोत असेही ते म्हणाले. अत्यंत नम्रतेने पराभव स्वीकारून, आम्ही त्याची कारणे ओळखू, दुरुस्त करू आणि पुढे जाऊ,असे ते म्हणाले. निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून भाजपचे प्रदेशाध्यक्ष कटील राजीनामा देतील का या प्रश्नाला उत्तर देताना बोम्मई म्हणाले की असा कोणताही प्रश्न नाही आणि त्यावर चर्चाही झालेली नाही.