पोटाची खळगी भरण्यासाठी भटक्या समाजातील मुलांचा आयुष्याशी “खेळ’
निमसाखर : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सर्वत्र ‘बालदिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो; मात्र दुसरीकडे शिक्षणाचा हक्कापासून गावोगावी पोटासाठी खेळ करणारे भटक्या समाजातील मुले / मुली आजही वंचित असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळते.
लहान मुलं म्हटलं की देवाघरची फुलं, लहान मुलं म्हणजे पंडित नेहरुंच्या जीव की प्राण असं म्हटलं जातं. शहरी भागात मोठ्या प्रमाणावर बालदिन साजरा होतो; मात्र शाळा वगळून अनेक शासकीय कार्यालयांमध्ये क्वचितच बालकांसाठी बालदिन साजरा होताना दिसते. महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी बालशिक्षण हक्क कायदा आणि संरक्षणासाठी ही कठोर कायदे आहेत. सगळे असले तरी आजही भटके समाज व ऊस तोडणी कामगारांची मुले यांच्याकडे शासन गंभीरतेने पाहणार का? अनेक साखर कारखान्यांवरील साखर शाळा कुठे गेल्या? यांसह अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.
इतर भटक्या समाजाबरोबरच डोंबारी समाज कसरती करून उदरनिर्वाह करतो. याचबरोबर गेले काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक लहान मूल उसाच्या शेतामध्ये उसाचे वाडे गोळा करतानाचा मन गहिवरून येईल असा व्हिडिओ अनेकांच्या स्टेटसला आणि व्हाट्सअप ग्रुपवर पाहावयास मिळाला. सासवड व परिसरामध्ये फळ विक्रीसाठी शिक्षण घेत अनेक लहान मुले देखील आपल्या आई-वडिलांबरोबर फळ विक्रीसाठी उभे असतात; मात्र हे फळविक्रीचे काम करीत असताना मोकळ्या वेळेत अभ्यासही करत असल्याचे चित्र दिसून येते.
ग्रामीण भागातील वालचंदनगर येथे एका शिक्षकाने अल्पवयीन मुलींना केलेला बॅड टच आणि अनेक सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या आणि न्याय मिळावा हाच हेतू मनाशी ठेवून आंदोलने होत आहेत; मात्र याही ठिकाणी सामाजिक संघटनांना पुरेसा न्याय मिळत नाही अशी या संघटनांची ओरड आहे. अनेक शहरी भागातही किंबहुना ब्रीजवर ही अशी उमलण्यापूर्वीच कोमेजून गेलेली मुलं दिसतात.
तेव्हा प्रत्येक नागरिकाचा जीव कासावीस होतो.
सत्तेच्या, स्वार्थाच्या राजकारणात आपलं कर्तव्य, जबाबदारी विसरलेल्या, मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या प्रशासनाला हा दोरीवरून वेगवेगळ्या कसरती करत डोंबारी खेळ करताना अशा सदिच्छा तर देत नसेल ना? दारिद्य्र रुपी कुटुंबात पडलेला अंधार दूर होऊ दे, अशी प्रार्थना ते देवाकडे करत आहेत. शाळेत जाण्याची संधी मिळाली, तसाच पुढचा मार्गही सोपा होऊ दे, हीच त्यांची इच्छा असणार!