* गाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
* गावाला छावणीचे स्वरूप
* पिराच्या मंदिराचा विषय तापला
* चुकीची नोंदणी ठरली कारणीभूत
पारगाव : पारगाव (ता. दौंड) येथे गेल्या पाच महिन्यांपासून वादग्रस्त असलेल्या पिराच्या मंदिराच्या विषयावरून जातीय सलोख्याला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावात तणावपूर्ण शांतात असून पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याने गावला छावणीचे स्वरुप आले आहे.
पारगावमध्ये पुरातन पिराचे मंदिर असून ग्रामपंचायत दप्तरीही पीर मंदिर असा उल्लेख असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी पुरातन काळापासून सर्व धर्मीय लोक जात असत. त्या भोवतालचा परिसर शिवाजी उद्यान म्हणून घोषित करून त्या ठिकाणी गावच्या पाणीपुरवठा टाक्या आहेत. या ठिकाणी साफसफाई झाडे लावणे मॉर्निंग वॉक ट्रॅक तयार केले आहे.
मुस्लीम समाजाच्या लोकांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले, त्यासाठी वर्गणी गोळा करून व काही निही हा आमदार राहूल कुल यांच्या निधीतून उपलब्ध झाला. आतापर्यंत अगदी अलबेल चालले होते; परंतु या पिरबाबा मंदिराचे नाव हजरत पीर शा दवल बाबा दर्गा या नावाने औरंगाबाद वक्फ बोर्ड या ठिकाणी नोंदणी करण्यात आली व मंदिर मालकीची परिसरातील 13860 चौ. मिटर जागेची त्यात नोंद करण्यात आली. जी जागा मंदिराच्या नावावर नाही.
ग्रामस्थांना हे कळल्यानंतर गावात बैठक घेऊन यवत पोलीस ठाण्यात या ट्रस्टमधील सदस्यांवर खोटी कागदपत्रे देऊन वक्फ बोर्डमध्ये नोंद केल्याबाबत त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर संबंधितांनी यवत पोलीस ठाण्यात आपला गुन्हा मान्य केला. व त्याबाबत तसा जबाब सुद्धा लिहून दिला होता. ही नोंदणी आम्ही रद्द करून आणतो, असे मान्य केले होते; परंतु बुधवारी (दि. 9) दौंड तहसील कार्यालयात पीर मंदिर भोवतालची 13860 चौ. मि.जागा वक्फ बोर्डच्या नावे करण्यासाठीचे पत्र दाखल झाले अन् गावात एकच असंतोष उफाळला.
बुधवारी सायंकाळी आठ वाजता, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 300 ते 400 युवक व ग्रामस्थांनी याबाबत बैठक आयोजित केली होती. त्यावेळी तणावाचे वातावरण तयार झाले होते. त्वरीत दोषींवर गुन्हे दाखल करा जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत गाव बंदची स्वयंफूर्तीने हाक देण्यात आली. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार उपस्थित होते. गुरुवारी (दि. 10) गुन्हा दाखल करणार, असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर तणाव निवळला.
पारगाव बुधवारी (दि. 9) सायंळकापासून स्वयंपूर्तीने बंद ठेवण्यात आले होते ते गुरुवारी (दि. 10) ही बंदच ठेवले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या संख्येने पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, गुरुवारी पारगावमध्ये तहसीलदार संजय पाटील, बारामतीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, दौंडचे उपविभागीय अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहायक निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी येऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच गुन्हे दाखल झाले असून योग्य प्रकारे तपास होईल, असे आश्वासन दौंड, बारामती येथील पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर गावातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले.
पारगाव येथील गट नं.1601/1/अ चे 1970 पासून अवलोकन करता, सरकारी गायरान शाळेकडे पुनर्वसाहत गावठाण अशी नोंद दिसून येत आहे. यात कुठल्याही प्रकारचे वक्फ बोर्डच्या संबंधीचे नोंद दिसून येत नसल्याने याची हजरत पीर शाह दावल बाबा दर्गा, अशी नोंद 7/12मध्ये करता येणार नाही, असे औरंगाबाद येथील महाराष्ट्र वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राने कळविण्यात आले आहे, तरी ग्रामस्थांनी गाव बंद आंदोलन मागे घ्यावे.
– संजय पाटील, तहसीलदार, दौंड
रेडिरेकनरच्या दराऐवजी प्रति चौ. मीटर असा उल्लेख
मागील आठवड्यात एका संघटनेच्या कार्यकर्त्याने पीर मंदिर या ठिकाणी भडकावू भाषण केले होते. त्यावेळी ही ग्रामस्थांनी शांततेत मोर्चा काढून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीर मंदिराची गाव नमूना 8 मध्ये मिळकत नं.162 मध्ये 607 स्क्वे. फूट इतकीच नोंद असून रेडिरेकनर दर हा 13860 हा प्रति चौ. मि. असा उल्लेख असून वक्फ बोर्ड चुकीच्या पद्धतीने हाच रेडिरेकनरचा दर हे क्षेत्रफळ म्हणून उल्लेख करीत आहे. या विरोधात ग्रामपंचायत मधील काही सदस्य व काही ग्रामस्थांवर जबाबदारी टाकून न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावण्याचा या सभेत निर्णय घेण्यात आला.