श्रीकांत कात्रे
स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी काही तरी केले पाहिजे, या उर्मीतून मनीषा कुलकर्णी यांनी आगळावेगळा उद्योग सुरू केला. स्वतः आर्थिक स्वावलंबी होताना इतरांच्या आरोग्याचा विचारही त्यांनी केला. त्यामुळेच सोयाबीनवर प्रक्रिया करून पदार्थ तयार करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. संघर्षातून आपल्या उद्योगाचा जम बसविला. लोकांच्या मागणीनुसार उत्पादन घ्यायचेच. पण त्याहीपेक्षा लोकांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण उत्पादन करण्याचा त्यांचा निर्णय समाजासाठी उपयुक्त आहे. त्यातून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्याच. पण त्यांनी इतर महिलांनाह रोजगाराची संधी दिली..
मूळ गाव वाई असलेल्या मनीषा कुलकर्णी सध्या नवीन पनवेल येथे राहतात. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी कायद्याची पदवी घेण्यासाठी प्रवेश घेतला. तथापि, ते शिक्षण अपूर्ण राहिले. लग्नानंतर पतीच्या नोकरीच्या निमित्ताने त्यांचे वास्तव्य पनवेलमध्ये राहिले. मुले लहान अल्यामुळे त्यांना इच्छा असूनही काही करता येत नव्हते. मुले मोठी झाल्यावर मात्र त्या स्वस्थ बसल्या नाहीत. काही तरी केले पाहिजे या उर्मीने त्या कामाला लागल्या. काही व्यवसाय करायचा हे त्यांच्या मनात निश्चित होते. पण नेमका कोणता व्यवसाय करायचा हे ठरत नव्हते.
कारण त्यांना फक्त स्वतःपुरते काही करायचे नव्हते. तर आपण जो व्यवसाय करू त्यतून समाजालाही काही देता आले पाहिजे, असा विचार त्यामागे होता. त्याचवेळी सोयाबीन प्रक्रिया उद्योगाबाबत प्रशिक्षणाची एक जाहिरात त्यांच्या वाचनात आली. त्यांनी प्रयत्न केला आणि त्यासंदर्भात पाच दिवसांचे प्रशिक्षण घेतले. या विषयातील त्यांचा रस वाढत होता. यातून निश्चितच स्वतःच्या प्रगतीला वावही आहे आणि समाजासाठीही काही करता येईल, असे त्यांना वाटत गेले. मग या व्यवसायाची अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. भोपाळला केंद्र सरकारचे केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र आहे.
तिथे प्रशिक्षण घेण्याचे त्यांनी ठरविले. सोयाबीनची पूर्ण माहिती, त्यापासून बनणारे पदार्थ, प्रक्रिया उद्योग म्हणजे काय, उद्योजिका कसे बनायचे असे प्रशिक्षण मिळाल्यावर त्यांची नवी वाटचाल सुरू झली. पनवेल येथेच उद्योग सुरू झाला. सोयाबीनचा आटा, शेव, लाडू असे पदार्थ तयार करण्यास सुरवात झाली. कुपोषित मुलांना हे पदार्थ दिले जाऊ लागले. सोयाबीनमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मानवाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेले प्रोटीन सोयाबीनपासून तयार केलेल्या पदार्थातून देण्याचे जणू व्रतच त्यांनी अंगिकारले. कोणतीही प्रक्रिया न करता सोयाबीन घेतले तर त्याचा उपयोग होत नाही.
त्यामुळे प्रक्रिया करून तयार केलेल्या उत्पादनाचा फायदा होतो, हे लक्षात घेऊन त्यांनी काम सुरू केले. सोयाबीनची पावडर इतर पदार्थांमध्ये मिसळून काही पदार्थ तयार होऊ शकतात. मात्र, एका सर्व्हेनुसार इतर देशात आहारामध्ये सोयबीनचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्या तुलनेत आपल्याकडे खूपच कमी प्रमाणात सोयाबीनचा वापर होतो. त्यामुळे आरोग्यासाठी उपयुक्त सोयाबीनचा वापर वाढविण्यासाठी जनजागृती करण्याची गरज होती, असे मनीषा यांनी सांगितले. सोया आटा, सोया शेव, सोयाने, सोयापॉप, सोयामुफिन्सस असे पदार्थ तयार करून लोकांपर्यंत हे पदार्थ पोहचू लागले. मागणीनुसार ऑर्डर्स पूर्ण होऊ लागल्या. शाकाहारींसाठी सोयाबीन म्हणजे कामधेनू आहे. आरोग्याचा कल्पवृक्षच आहे,
असे त्या सांगत होत्या. संपूर्णा फूडस या त्यांच्या ब्रॅंन्डद्वारे सोया पदार्थ विक्री होऊ लागले. सर्वात जास्त पोषणमूल्ये असलेल्या सोयाची पावडर चपाती, पुरी, पराठा अशामध्ये मिसळली की तो पदार्थ अधिक आरोग्यदायी होतो. यासाठीचा कच्चा माल त्यांना स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध होता. तसेच गावाकडूनही मिळायचा. जागृतीसाठी प्रयत्न सुरू असतानाच त्यांनी सोयाबीनच्या पदार्थाप्रमाणेच काही इतर भाजण्या तयार करण्याचे ठरविले. थालिपीठ भाजणी, उपवास भाजणी, चकली भाजणी, डांगर भाजणी, मेतकुट, घावन पीठ अशा प्रकारच्या भाजण्यांनाही मागणी वाढली. त्याचबरोबर शुद्ध तूप आणि गुळापासून बनविलेले लाडू त्या तयार करून लागल्या. त्यामध्ये डिंक लाडू, मेथी लाडू, सोया लाडू, नाचणी लाडू असे प्रकार बनू लागले.
अशातच दोन वर्षांपूर्वी माणदेशी फाउंडेशनशी त्यांचा संपर्क आला. एका कार्यशाळेपासून सुरवात झाली. पुढे उद्योगाचे पूर्ण नियोजन, अकाउंटस, मार्केटिंग, डीजीटल ऑनलाइन मार्केटिंग असे विविध प्रकार माणदेशीच्या माध्यमातून शिकता आले. माणदेशीच्या पाठबळामुळे आणखी दिशा मिळाली. करोनाच्या काळात लॉकडाऊन असतानाही त्यांच्या पदार्थांना मागणी होती. घरून पदार्थ करून ग्राहकांना मागणीनुसार पुरवले जायचे. सुरवातीला एक क्विंटल असणारे उत्पादन आता दोन क्विंटलपर्यंत पोहचले आहे. काही महिलांनाही काम दिल्यामुळे त्यांनाही रोजगार उपलब्ध होतो.
हे काम त्यांना वाढवायचे आहे. मिक्सर, ग्राइंडर, छोटी पिठाची गिरणी त्यांच्याकडे आहे. मात्र, उद्योगासाठी मोठी जागा हवी आहे. रोज सकाळी घरकाम सांभाळून त्यांच्या कामाला सुरवात होते. सायंकाळी साडेसहा सातपर्यंत काम सुरू राहते. कधी मागणी जास्त असेल तर उशिरापर्यंत काम चालते. यामागे त्यांचे कष्ट आहेत. चिकाटीने व्यवसाय वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आरोग्यासाठी फलदायी ठरणाऱ्या सोया उत्पादनांसाठी त्यांनी केलेला वेगळा प्रयोग इतरांनाही मार्गदर्शकच ठरला आहे.