काही दिवसांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी शालेय शिक्षणातून गृहपाठ बंद करण्याचा विचार बोलून दाखवला आहे. त्याबाबत मीमांसा…
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या गृहपाठासंबंधाने भूमिका माध्यमांसमोर मांडली. ती मांडताना केवळ विचार सुरू असल्याचे सुतोवाच केले होते. तज्ज्ञांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असे त्यांनी म्हटले मात्र त्यानंतर त्या संदर्भाने उलट सुलट चर्चेला आरंभ झाला. दोन टोकाची मतेही व्यक्त होऊ लागली. गृहपाठ हे शिक्षकांबरोबर पालकांना देखील हवे आहेत. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी कोणताच अभ्यास दिला नाही तर पालक शिक्षकांना जाब विचारतात. मार्कांच्या वाढत्या स्पर्धेने शिक्षणाचा अर्थ बदलला आहे. गुण मिळवायचे असेल तर फक्त शाळा, महाविद्यालयात शिकणे पुरेसे नाही त्यासोबत शिकवणी अनिवार्य आहे असा समज पक्का होत चालला आहे.
पालकांची असलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे लादले जाते त्यातून गृहपाठाचा दबाव मोठ्या प्रमाणावर येतो आहे. सध्याचे गृहपाठाचे स्वरूप हे ना आनंददायी आहे, ना कृतीशील आहे. प्रश्न आणि उत्तरे, पुस्तकाखालील प्रश्न लिहिणे म्हणजे शिकणे आणि गृहपाठ करणे असे स्वरूप झाले आहे.
वर्गात एखादा घटक शिकविल्यानंतर मुलांच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या प्रेरणेने त्याने घरी येऊन केलेल्या कृतींचा विचार म्हणून गृहपाठाकडे पाहायला हवे. शिकण्याबरोबर अवांतर ज्या ज्या गोष्टी मुलं करतात ते सारेच शिकणे असते. आपल्याकडे शिकण्यासंदर्भाने व्यापक विचारच केला जात नाही. पुस्तकाभोवती असलेले शिक्षण, पुस्तक केंद्रित घटकांशी संबंधित प्रश्नोत्तरे याभोवती गृहपाठाचा विचार केला जात आहे. शिक्षणाकडे व्यापकतेने पाहिले तर गृहपाठाचे स्वरूपही बदलू शकते. मुलांना स्वतःहून गृहपाठ करण्याची प्रेरणा अधिक महत्त्वाची आहे. सक्ती आणि केवळ दबावाने मुलं जे काही करतात तो गृहपाठ म्हणजे केवळ हमाली काम आहे. गृहपाठाचे ओझे व्हायला नको याची काळजी घेण्याची गरज आहे. त्यातून शिक्षणमंत्री बोलले ते ओझ्याच्या चिंतेने. मात्र गृहपाठाचे ओझे का होते? याचा विचार करण्याची गरज आहे. सध्याच्या परीस्थितीत पारंपरिक गृहपाठातून ना गुणवत्ता उंचावते, ना मुलांना आनंद मिळतो. त्यामुळे गृहपाठ बंद करण्यापेक्षा गृहपाठाच्या स्वरूपात बदल केला तर गुणवत्ता उंचावण्यास निश्चित हातभार लागेल.
शिक्षणाच्या प्रक्रियेत अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन या त्रिकोणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याशिवाय शिक्षण प्रक्रिया पूर्ण होत नाही. वर्गातील अध्यापनाची प्रक्रिया झाल्यानंतर विद्यार्थ्यांची शिकण्याची प्रक्रिया अधिक समृद्ध होण्याच्या दृष्टीने सराव आवश्यक असतो.
सराव झाला तर कौशल्य प्राप्त करणे शक्य होते. त्यादृष्टीने गृहपाठाचे महत्त्व आहेच. वर्गात एखादा घटक शिकविल्यानंतर त्या घटकाच्या संदर्भाने विद्यार्थ्यांना समद्ध अनुभवासाठी गृहपाठाची गरज असल्याचे सांगितले जाते. गृहपाठ करण्यामागे स्वतःहून शिकणे या प्रेरणेचा विचार असतो. गृहपाठाच्या स्वरूपाने मात्र शिकण्यातील आनंद घालवला असल्याचे विद्यार्थी मुक्तपणे सांगू लागले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्यावतीने मानसिक आरोग्यावर सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वेक्षणानुसार 81 टक्के विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास, परीक्षा आणि निकाल हेच चिंतेचे कारण असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 50 टक्के विद्यार्थ्यांना चिंतेचे कारण हे अभ्यास असल्याचे आढळून आले आहे. 33 टक्के विद्यार्थी समवयस्कांच्या दबावातून अभ्यास करतात. 31 टक्के विद्यार्थी परीक्षा आणि निकालासंदर्भाने चिंतेत असल्याचे दिसून आले आहे. यातील अभ्यास म्हणजे गृहपाठ हाही मोठा भाग आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे म्हणजे अवांतर वाचन, विविध प्रकाच्या कृती, निरीक्षण, संवाद, अभिव्यक्ती यांसारख्या घटकांचा विचार केला जात नाही तर, केवळ गृहपाठ करणे, लिहिणे म्हणजे अभ्यास अशी धारणा बनत चालली आहे. अभ्यासाचा व्यापक अर्थ हरवत चालला आहे.
एकच काम पुन्हा पुन्हा केल्याने कौशल्य वद्धी होते पण त्यासाठी त्यात नावीन्य असायला हवे. प्रत्येक गोष्ट करताना मुलांना आनंद मिळायला हवा असतो. मात्र सातत्याने एकाच प्रकारचे लेखन करत राहिल्याने त्यातील आनंद हरवला जातो. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री असताना त्यांनी पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ नको अशी भूमिका घेतली होती. खरंतर तिसरीपर्यंत प्रत्यक्ष गृहपाठाच्या संदर्भाने अधिक गंभीर विचार करण्याची गरज आहे. सध्या शिकणेच अधिक समद्ध होण्याची गरज आहे. त्यासाठी विविध स्वरूपाच्या अनुभवांची गरज आहे. ते अनुभव केवळ शाळेतच दिले जातील असे नाही तर ते घर, परिसरातील देखील असू शकतात. ते अनुभव अनुभवणे हाही स्वाध्याय आहे.
केवळ प्रश्नोत्तरे म्हणजे गृहपाठ आणि शिकणे नाही. या काळात विद्यार्थ्यांच्या श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन कौशल्यांच्या विकासावर भर द्यायचा असतो. त्याच बरोबर संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया यावर विशेष भर असतो. या क्रिया करताना वर्गात अधिक उत्तमोत्तम अध्ययन अनुभव दिले गेले तर त्यातून शिकणे अधिक पक्के होण्यास मदत होईल. आरंभीच्या शिक्षणात देखील श्रवण आणि भाषण कौशल्यासाठी फारसे प्रयत्न शालेय स्तरावर होत नाही. मात्र या स्तरावर शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करायची असतील तर आई, बाबा, आजी आजोबांशी गप्पा, परिसर भेट, पाहिलेल्या ठिकाणाचे वर्णन, अनुभव, औपचारिक-अनौपचारिक गप्पा, गोष्टी ऐकणे, सांगणे, गाणे म्हणणे, परिसर भेट, प्राण्यांचे निरिक्षण करणे, स्वयंपाक करताना निरीक्षण करणे ते अनुभव कथन करणे, गाणी म्हणणे, शेतीला, गोठ्याला भेट देणे. वस्तू बनविणे, विद्यार्थ्यांनी एकमेकाशी केलेल्या गप्पा, गोष्टींचे पुस्तके, वर्तमान पत्र हे सारे गृहपाठच आहेत, हे जाणून घ्यायला हवे. यासारख्या अनेक कृतींचा विचार केला गेला तर अभ्यासाचे ओझे होणार नाही आणि गृहपाठ झाल्याचे समाधानही मिळेल.
गृहपाठ हे कृतीशील आणि आनंददायी असायला हवेत. गृहपाठ हे जीवन शिक्षणाचा अनुभव देणारे असायला हवेत असे सातत्याने बोलले जात असले तरी आपला सारा भर हा लेखनावर आहे. प्राथमिक स्तरावर घर, परिसर आणि शाळेत केली जाणारी प्रत्येक कृती ही शिकणेच आहे. गृहपाठाचा विचार करताना शिकणे अधिक कृतियुक्त शिक्षण होईल असे असावे. त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांच्या नवनिर्माणाला चालना मिळायला हवी. गृहपाठाच्या माध्यमातून सहजतेने शिकणे व्हायला हवे, बालकाला आनंद मिळायला हवा. केवळ पुस्तकातील प्रश्न आणि त्यातील आशयातील उत्तरे लिहून आणणे हा गृहपाठ असेल तर अशा गृहपाठातून विद्यार्थ्यांची सुटका व्हायला हवी.
शिकणे हे आनंददायी झाले तर गृहपाठ करून आणण्याचे ओझे होणार नाही आणि त्याची सक्ती वाटणार नाही. आज केले जाणारे गृहपाठ केवळ पुस्तकातील पाठातील आशय केंद्रित आहे. त्यातून अभ्यासाच्या सक्तीची भावना निर्माण होते. अनेकदा पालकांचा दबाव आणि परीक्षेतील गुणांसाठी हे केले जात आहेत. परीक्षेत गुण मिळतील पण त्यातून शिकले किती जाते याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे गृहपाठाच्या संदर्भात व्यापक विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. या निमित्ताने निर्णय झाला नसला तरी किमान चर्चेला सुरुवात तरी झाली आहे, हेही नसे थोडके.फ