संवाद कार्यक्रमात कृषी धोरणांवर विचारमंथन
परिंचे – अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून अतिवृष्टीचा प्रश्न केंद्र व राज्य शासनाकडे मांडणार असल्याचे माजी केंद्रीय कृषी मंत्री तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. परिंचे (ता.पुरंदर) येथे शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी ग्वाही दिली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप उपस्थित होते. कार्यक्रमात महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी सुळे यांनी केली.
शेतकरी संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांनी शेतीमालाला हमी भाव, पिलाणवाडी पाणी योजना , पुरंदर विमानतळ, जेजुरी येथील रेल्वेचे प्रश्न, तरुणांना रोजगार आदी विषयांवर प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना उत्तर देताना पवार म्हणाले की, केंद्रीय कृषी मंत्री असताना राबवलेल्या फळबाग योजनेमुळे कोकणातील तरुणांचे मुंबईला नोकरीसाठी स्थलांतरित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.देशाचे कृषीमाल निर्यात धोरण वारंवार बदलत असल्याने इतर देशांना मागणीनुसार शेतीमाल पोहोचवणे शक्य होत नाही.
शिंदे सरकारची फसवी भूविकास बॅंकेची कर्ज माफी घोषणा फसवी आहे. गेल्या दहा वर्षांत एकही शेतकऱ्याला या बॅंकेकडून कर्ज पुरवठा झाला नाही. गुंजवणीच्या पाण्यावर राजकारण न करता एक विचाराने योजना राबविल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. पुरंदरमध्ये होणारे विमानतळ ही महाराष्ट्राची गरज नसून देशाची गरज आहे. कमीत कमी शेतकऱ्यांचे नुकसान होईल याचा विचार करून विमानतळ केले जाणार आहे.
पुरंदर मधून गेल्या वर्षी पाच लाख टन ऊस सोमेश्वर कारखान्यात गाळपासाठी गेला आहे. कारखान्याने शिक्षण करापोटी पुरंदर मधील शेतकऱ्यांकडून जमा केलेल्या रकमेतून पुरंदर तालुक्यातील मुलींच्या शिक्षणासाठी सुविधा पुरवल्या पाहिजेत.
यावेळी आमदार संजय जगताप, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, सुदाम इंगळे, विजय कोलते, पुरुषोत्तम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. पुष्कराज जाधव यांनी स्वागत केले. हेमंतकुमार माहूरकर यांनी प्रस्ताविक केले. माणिकराव झेंडे यांनी आभार मानले.