शिर्डी – श्री साईबाबा संस्थानतर्फे आयोजित 104वा श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवास आज (मंगळवार) पहाटे श्रींचा फोटो व पोथीच्या मिरवणुकीने सुरुवात झाली. मुंबई येथील द्वारकामाई मंडळाने प्रवेशद्वारावर उभारलेल्या श्री साई दरबार या देखाव्याने व आकर्षक विद्युत रोषणाईने साईभक्तांचे लक्ष वेधून घेतले.
उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे 5.15 वाजता श्रींची काकड आरती झाली. आरतीनंतर पहाटे 05.45 वाजता श्री साईबाबांच्या प्रतिमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी वीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी पोथी आणि वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉ. शैलेश ओक व सामान्य प्रशासन प्र. अधीक्षक नवनाथ कोते यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. या वेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, प्रशासकीय अधिकारी कैलास खराडे, संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी, मंदिरप्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते. मिरवणूक द्वारकामाईत आल्यानंतर श्री साईसच्चरित ग्रंथाच्या अखंड पारायणास प्रारंभ झाला. या वेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बानायत यांनी प्रथम व द्वितीय, प्र. प्रशासकीय अधिकारी संजय जोरी यांनी तृतीय, विभागप्रमुख राहुल गलांडे यांनी चौथ्या व अतुल वाघ यांनी पाचव्या अध्यायाचे वाचन केले.
सकाळी 7 वाजता समाधी मंदिरात श्री साईबाबा संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व त्यांची पत्नी दीपाली भोसले यांनी श्रींची पाद्यपूजा केली. दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती झाली. दुपारी 4 वाजता अंजली जोशी (डोंबिवली) यांचे कीर्तन झाले. सायंकाळी 6.15 वाजता श्रींची धुपारती झाली. रात्री 7.30 ते 9.45 यावेळेत संजय जोशी यांचा गीत रामायण हा कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर झाला. रात्री 9.15 वाजता गावातून पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर श्रींची शेजारती झाली. अखंड पारायणासाठी श्री द्वारकामाई मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात आले.उद्या (बुधवार) पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी पहाटे 5.15 वाजता श्रींची काकड आरती, पहाटे 05.45 वाजता अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक,
पहाटे 06.20 वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी 07.00 वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी 9 वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी 10 वाजता अंजली जोशी (डोंबिवली) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, तसेच सकाळी 10.30 वाजता श्रींच्या समाधीसमोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती, तर सायंकाळी 5 वाजता खंडोबा मंदिर येथे सीमोल्लंघन कार्यक्रम, सायंकाळी 6.15 वाजता धुपारती होईल. रात्री 7.30 ते 10 यावेळेत नीरजा पालवी (भोपाल) यांचा भजन संध्या कार्यक्रम होणार असून, रात्री 9.15 वाजता गावातून श्रींच्या रथाची मिरवणूक होणार आहे. रात्री 10 ते पहाटे 5 यावेळेत श्रींच्या समोर कलाकार हजेरी कार्यक्रम होईल. उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्यामुळे दि. 5ला रात्री 10 वाजता होणारी शेजारती व दि. 6 रोजी पहाटेची 5.15 वाजता होणारी काकड आरती होणार नाही.