भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना ऊस तोडणीसाठी त्रास सहन करावा लागला. हा त्रास पुन्हा सभासदांना होऊ नये म्हणून यावर्षी हार्वेस्टिंगमध्ये सुधारणा करीत आहे. कारखाना सुरू झाल्यापासून सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचा आडसाली ऊस गाळपास घेतला जाणार आहे. तोपर्यंत गेटकेन ऊस गाळपास घेतला जाणार नाही, अशी मािंहती श्री छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची 64 वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात सर्व विषय मंजूर होऊन पार पडली. दुपारी दोन ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत साधारण साडेसहा तास सभा सुरू होती.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, सर्व संचालक, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, माजी अध्यक्ष अविनाश घोलप, अमरसिंह घोलप, मुरलीधर निंबाळकर, भाऊसाहेब सपकळ, कार्यकारी संचालक अशोक जाधव, सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.
काटे म्हणाले की, कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये यावर्षीच्या ऊस गाळपासाठी अंदाजे 11 लाख टन ऊस गळीतास उपलब्ध होईल तसेच कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेन उसाचे करार करण्यात येत आहेत. त्याद्वारे तीन लाख टन ऊस गाळपास उपलब्ध होणार आहे. असा एकूण 14 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे. श्री छत्रपती कारखान्यातील दोन्ही युनिटचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे.
दि. 10 ऑक्टोबरपर्यंत हे दोन्ही प्लांट गाळपासाठी सज्ज होणार आहेत. यासाठी 400 ट्रॅक्टर, 700 ट्रॅक्टर गाडी, 1050 बैलगाडी व सहा हार्वेस्टर तसेच बिगर ऍडव्हान्स मधील 105 ट्रॅक्टर व 50 ट्रॅक्टर गाडी आदी वाहनांचे करार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे दररोज 11 हजार 800 टन उसाचा पुरवठा होणार आहे.
हंगाम 2021 – 22 करिता केंद्र शासनाने दहा टक्के रिकव्हरिस प्रति टन 2 हजार 900 रुपये व त्यापुढील एक टक्के रिकव्हरीस 290 रुपये याप्रमाणे एफआरपी निश्चित केली आहे. या सूत्रानुसार आपले कारखान्याची हंगाम 2021-22 करिता सरासरी रिकव्हरी 10.96 टक्के धरून व सरासरी ऊस तोडणी वाहतूक खर्च प्रति टन 685 रुपये 38 पैसे वजा करून निव्वळ एफआरपी प्रति टन 2 हजार 493 रुपये 2 पैसे इतकी होत आहे. त्यापैकी प्रति टन रुपये 2 हजार 400 प्रमाणे शेतकरी सभासदांना पेमेंट अदा केले आहे.
यावेळी पांडुरंग कचरे, अमरसिंह कदम, शिवाजी निंबाळकर, संभाजी काटे, अशोक काळे, सतीश काटे, तानाजीराव थोरात, नानासाहेब निंबाळकर, प्रशांत पवार, रवींद्र टकले, शरद जामदार, शितल काटे, भाऊसाहेब सपकळ, देवेंद्र बनकर, अमोल भोईटे यांनी विविध विषयावर मते मांडली.
सभा सुरू होताच तानाजी थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडताच शिवसेनेचे बाळासाहेब शिंदे यांनी विरोध केला. त्यावेळी उपस्थित सर्व सभासदांनी जे कोणी पदावर असेल त्या सर्वांचा एकदाच अभिनंदनाचा ठराव मांडावा व सभेपुढील विषयांवर चर्चा करावी अशी मागणी केली.
अजितदादांवरील आरोपांमुळे सभेमध्ये गदारोळ
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची 64 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना चालत असून अजित पवारांमुळेच कारखान्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत, असा आरोप सभासदाने केल्याने सभेमध्ये गदारोळ निर्माण होऊन काही काळ कामकाज तहकूब झाले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार हे छत्रपती कारखान्याचे संचालक नाहीत.
अध्यक्षही नाहीत व ते कोणत्या कमिटीवरही नाहीत. तरीदेखील त्यांच्यावर वैयक्तिक आरोप केला जात असल्याने पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ व कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी असे वैयक्तिक आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. यावर वैयक्तिक नाव घेऊन आरोप करणाऱ्यांनी माफी मागितली नाही, तर सभा होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतल्याने काही काळ वातावरण चांगलेच तापले होते.