मुंबई – मे महिन्यापासून भारतीय रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात तब्बल 1.40 टक्के वाढ केल्यामुळे अगोदर कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या हप्त्याच्या रकमेत वाढ झाली आहे. त्याचबरोबर नवे कर्ज अधिक व्याजदरावर घ्यावे लागत आहे. असे असतानाच रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी व्याजदरात (रेपो) आणखी 0.50 टक्के वाढ केली आहे.
त्यामुळे कर्जाचा हप्त्याची रक्कम वाढण्याबरोबरच दिवाळीत खरेदीसाठी कर्ज कमी प्रमाणात घेतले जाण्याची शक्यता आहे. आज रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात 0.50 टक्के वाढ केल्यामुळे आता रेपो दर तब्बल 5.90 टक्के इतका झाला आहे. यानंतर व्यावसायिक बॅंका या प्रमाणात व्याजदरात वाढ करणार आहेत.
जगातील विविध देशाच्या बॅंका व्याजदरात वाढ करीत आहेत. त्याचबरोबर रशिया- युक्रेन युद्धामुळे जागतिक आर्थिक परिस्थिती आणखी खराब झाली आहे. अशा परिस्थितीत महागाई रोखणे गरजेचे असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेनेही व्याजदरात वाढ केली आहे. या व्याजदरवाढीमुळे ज्या ग्राहकानी घर आणि वाहनासाठी कर्ज घेतले असेल त्यांना अधिक हप्ता द्यावा लागणार आहे.
त्याचबरोबर व्याजाचा दर जास्त असल्यामुळे आणि उत्पन्न कमी असल्यामुळे नवे ग्राहक कर्ज घेणे टाळण्याची शक्यता अशा. परिस्थितीत त्याचा विकासदरावर परिणाम संभवतो. त्याचबरोबर उद्योगाकडून आणि नागरिकांकडून भांडवलाचा वापर कमी होणार आहे. मात्र असे असले तरी महागाई रोखण्यासाठी काही काळ अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे असे रिझर्व्ह बॅंकेने सुचित केले आहे.
बॅंका व्याजदरात वाढ करणार असल्यामुळे जुन्या ग्राहकांना एक तर कर्ज परत फेडीचा कालावधी वाढवावा लागणार आहे किंवा हप्त्याची रक्कम वाढवावी लागणार असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. या व्याजदरवाढीचा ग्राहकाच्या क्रयशक्तीवर लघु ते मध्यम पल्ल्यात परिणाम संभवतो. डिसेंबरपर्यंत महागाई उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे.
त्यानंतर महागाई कमी झाल्यास रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करणे थांबवेल आणि त्यानंतर काही महिन्यांनी व्याजदर कपात करण्यास सुरुवात करू शकेल.तोपर्यंत भांडवलाच्या वापराला मर्यादा येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र या कालावधीत बॅंकातील ठेवीवरील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे.